आपले मानवाधिकार फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन व प्रशिक्षण वसई येथे संपन्न, संविधान जनजागृती ही काळाची गरज: अॅड.शुभांगी ताई पाटील
ब्यूरो/महाराष्ट्र
पालघर : आपले मानवाधिकार फाउंडेशन चे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन व प्रशिक्षण सोहळा संचालक डॉ. दिपेश पष्टे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अॅड.शुभांगी पाटील यांच्या शुभहस्ते ‘संविधान उद्देशिका’ वाचन करून पाचुबंदर, वसई येथे बालदिनानिमित्त संपन्न झाला.
छत्रपती शिवराय यांची शिकवण, संविधान विधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित कार्य करणारे आपले मानवाधिकार फाउंडेशन ने आपले दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन व पदाधिकारी यांच्याकरिता प्रशिक्षण आयोजित केले होते. त्याच बरोबर राज्यस्तरीय कोरोना जनजागृती स्पर्धा विजेत्यांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्रभर महिलांचे संघटन करून त्यांना रोजगार निर्मिती तसेच मार्गदर्शन करण्याचा सिंहाचा वाटा असलेल्या मा. वि. म. च्या दुसऱ्यांदा अध्यक्ष पद भूषवत असलेल्या ज्योती ठाकरे यांना संस्थेचा मानाचा ‘आपले मानवाधिकार नारी शक्ती गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. आपले मानवाधिकार चे कार्य हे कौतुकास्पद असून महिलांना सोबत घेऊन कार्य करत आहात म्हणजे नक्कीच ही संस्था फार पुढे जाईल. जिजाऊंनी स्वराज्य घडविण्यासाठी शिवरायांना सहकार्य केले तसेच या माता भगिनी संस्थेला उच्च स्तरावर नेतील अशी आशा आहे. स्वामी विवेकानंद यांचे विचार नेहमी सोबत ठेवून कार्य केल्यास प्रोत्साहन मिळते, असेही ज्योती ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
समाजामध्ये मोठया प्रमाणात अंधश्रद्धा वाढत असून कुठेतरी कमी होणे गरजेचे आहे हे जाणून संस्थेने ‘अंधश्रद्धा मुक्त अभियान’ राबविण्याचा संकल्प केला आणि यावेळी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथी विधीज्ञ देवेंद्र राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सर्वसामान्य जनता वैद्यकीय उपचार न करता अशा चुकीच्या प्रथा अनुसरून आपला बळी देत आहेत, याकरिता आपण सर्वांनी जनतेच्या मनातील भीती दूर करून अंधश्रद्धा मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.
सर्वसामान्य जनतेला कुठेही न्याय मिळत नाही. दिलेल्या हक्कांचे हनन होताना दिसत आहे, हे लक्षात घेऊन डॉ.बाबासाहेब यांनी आपल्याला काय अधिकार दिले आहेत हे प्रत्येक भारतीयांना माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून आपले मानवाधिकार फाउंडेशन ने ‘ संविधान जनजागृती अभियान’ राबविण्याचा निश्चय केला आणि या उपक्रम मध्ये उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे विधीज्ञ शुभांगी पाटील यांच्या शुभहस्ते सुरुवात केली.
कार्यक्रमामध्ये स्वागत करताना कोणत्याही प्रकारचे पुष्पगुच्छ न देता ‘ संविधान उद्देशीका ‘ भेट म्हणून देण्यात आली या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून केले जाते. तसेच संविधान जनजागृती होणे ही काळाची गरज आहे आणि आपल्या हक्कासाठी सर्वांनी संघटित होऊन लढले पाहिजे, असे शुभांगी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. सामाजिक कार्य करताना सर्व गोष्टींना कसे सामोरे जावे लागते यांचे सुंदर उदाहरण प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन चे अध्यक्ष कैलास दुधले यांनी दिले. संघटना कोणतेही चुकीचे अथवा गैरव्यवहार करणाऱ्या नागरिकांना पाठीशी घालणार नाही तर कायद्यानुसार त्यांच्या कारवाई करण्यासाठी सतत पाठपुरावा करणार असे सहसंचालक वैभव हरड यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमप्रसंगी मत्स्य व्यवसाय मंत्री यांचे स्वीय सहाय्यक, वसई विरार महानगर पालिका मा.महापौर प्रवीण शेट्टी, सर्वोदय मच्छीमार सोसायटी चे चेअरमन संजय कोळी, मच्छीमार नेता फिलिप मस्तान, पत्रकार, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन वसई शहर कार्यकारिणी यांनी केले. राज्य प्रमुख अनिता सातपुते यांनी सूत्रसंचालन केले तर राष्ट्रीय व्यवस्थापक सुनंदा खरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर राष्ट्रीय सहसचिव गणेश तांबे, राष्ट्रीय सदस्य मनोहर भोईर, राज्य अध्यक्ष नितीन सैद, प्रमुख सचिन जाधव, सचिव उत्तम सुतार, संपर्कप्रमुख दिवेश पष्टे, समन्वयक अरुण घासे यांनी विशेष मेहनत घेतली.