मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या वतीने महिला गौरव पुरस्कार सोहळा शानदार वातावरणात पार पडला.
महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या संयोजिका रेखा नार्वेकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, दरवर्षी साहित्य, समाजकार्य, क्रीडा, उद्योग, विज्ञान यापैकी एका क्षेत्राची निवड करून त्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या महिलेस सन्मानित करण्याच्या या परंपरेत यंदा जलतरण क्षेत्रातील आरती बाजीराव पाटील हिची निवड करण्यात आली, ही एक उत्तम निवड म्हणता येईल.
सोहळ्याच्या अध्यक्षा फैय्याज यांनी संगीत-नाट्य क्षेत्रातील आपले अनुभव कथन केले. प्रमुख अतिथी आणि प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल यांनी स्त्रियांनी धडाडीने कार्य करण्याची गरज असल्याचे सांगून महिलांना प्रोत्साहित करणारे गीत सादर केले. कुसुमिता या काव्यपूर्ती संग्रहाचे प्रकाशनही मान्यवरांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कविता भडके यांनी केले. यानंतर गौरी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली काव्यसंमेलन झाले. यात ज्योती कपिले, सुवर्णा जाधव, राधा पवार, जयश्री आपटे, हेमांगी नेरकर यांनी सहभाग दिला. कार्यक्रमास महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.