किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्यरत असणाऱ्या श्रीमती छायादेवी शिसोदे यांना पदोन्नती मिळाली असून त्या आता ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद ठाणे येथे प्रकल्प संचालक पदी नियुक्त झाल्या आहेत. सन २००२ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश केला.
त्यांनी परिविक्षाधिन कालावधीत उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून औरंगाबाद जिल्हा परिषदेत काम केले. त्यांनतर त्या औरंगाबाद येथील महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी पैठण येथे सहाय्यक प्राध्यापक रुजू झाल्या. त्यांनतर त्यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी पदी काम करताना बचत गटामार्फत अंगणवाड्यांना आहार पुरवठा सुरु करणारा औरंगाबाद हा राज्यात पहिला जिल्हा ठरला होता. श्रेणी ३ व श्रेणी ४ मधील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात औरंगाबाद विभागात औरंगाबाद पहिला जिल्हा होता. महिला बालकल्याणच्या अनेक योजनांची प्रभावीपणे अमलबजावणी केली होती.
जालना जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी (सा.प्र.वि) पदी काम करताना जिल्हा परिषदेला आयएसओ मानांकन मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या. त्याचबरोबर राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातून मिळालेल्या बक्षिसातून जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक सोयी सुविधासह, कोर्पोरेट पद्धतीची बैठक व्यवस्था निर्माण केली. औरंगाबाद विभागीय कार्यालात सहाय्यक आयुक्त (चौकशी) पदी काम करताना वर्ग २ व वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशी प्रकरणाची जलदगतिने सुनावणी घेऊन विभागीय चौकशी प्रकरणे प्रलंबित न ठेवता निकाली काढण्यात आली. औरंगाबाद जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्यरत असताना अनुकंपा भरती असेल, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांना पुरस्कार देण्याची योजना त्यांनी सुरु केली. त्याचबरोबर कागद पत्र प्रवास व्यवस्थापन पद्धतही त्यांनी सुरु केली होती. तसेच आलेल्या अभ्यंगताच्या तक्रारीचे निवारणकरण्यासाठी झेड संदर्भ पद्धती त्यांनी सुरु केली होती.
२०१७ साली त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदी काम करताना १२,१०६ शौचालय बांधकाम त्यांनी पूर्ण केले. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात काम केले. तसेच रखडलेल्या पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्याचे काम त्यांनी पूर्ण केले. याकाळात त्यांना प्रकल्प संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला होता. या पदावरही उत्कृष्ट काम करताना प्रधानमंत्री आवास योजनेत विभागात प्रथम आणि राज्यात तिसरा तर राज्य पुरस्कृत योजनेत विभागात तृतीय आणि राज्यात पाचवा क्रमांक मिळविण्याची किमया त्यांच्या नेतृत्वांखाली करण्यात आली. आता नियमित पदोन्न्ती नंतर त्या ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद ठाणेच्या प्रकल्प संचालक पदावर रुजी झाल्या आहेत.