किशोर पाटील/महाराष्ट्र
वासिंद : रस्त्यांची होणारी बोगस कामे हा ठाणे जिल्ह्याला लागलेला शाप असल्याची खंत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री तथा भिंवडी लोकसभा खासदार कपिल पाटील यांनी जन आशिर्वाद यात्रेवेळी वासिंद येथे पत्रकारांशी बोलताना केली।
ठाणे जिल्ह्यातील पहिले केंद्रीय मंत्री पद मिळालेले खासदार कपिल पाटील यांनी प्रथम आल्यानंतर तसेच देशाचा कारभार लोकाभिमुख असावा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडून ठाणे-रायगड जिल्ह्यातील अनेक भागात सोमवार पासून जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली होती. या दौऱ्यावर गुरुवारी शेवटच्या दिवशी ग्रामीण भागातील मुरबाड, किन्हवली, सापगांव, शहापूर, खातिवली, वासिंद आदी भागात आगमन झाले. त्यांचे जागोजागी स्वागत करण्यात आले.
या धर्तीवर वासिंद येथे त्यांनी थोडक्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील रस्त्यांवरील अवस्था बाबत नाराजी व्यक्त केली. सदर केंद्राकडून निधी मंजूर करून घेतला असला येथील कामे योग्य होत नसल्याने ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले पाहिजे असे स्पष्ट करून रस्त्यांची होणारी बोगस कामे हा जिल्ह्याला शाप असल्याचे खंत व्यक्त केली. तर या भागात एमएसआरडीसी विभागाचे लक्ष नसल्याची नाराजीही पाटील यांनी दर्शविली।
तसेच मी माझी जबाबदारी नाकारत नाही परंतु केंद्राशी निगडीत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल असणार असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदे आदि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. तर येथील पदाधिकारी अनिल शेलार, सुनील सोगळे, रंगनाथ काठोळे, दिलिप बेलवळे, काळूराम धनगर आदी कार्यकर्ते यांनी त्यांचे स्वागत केले।