महाराष्ट्र / उमेश जाधव
टिटवाळा -: मुक्या प्राण्यांना जीव लावला तर ते प्राणी अत्यंत प्रमाणिकपणे आपली साथ निभावतात, मात्र माणसांत आणि प्राण्यांच्यात असलेले हे नाते कधी-कधी फारच जिव्हाळ्याचे होते. आणि अशावेळी अचानक जर अशा जिव्हाळ्याचा प्राण्याचा मृत्यू झाला तर तो शोक आवरणे कठीण होऊन जाते. असेच काहीसे घडले आहे टिटवाळा नजीकच्या फळेगावातील जाधव कुटुंबियां सोबत. कल्याण ग्रामीण भागांत असलेल्या फळेगांव या गावांतील रहिवासी असलेले जाधव कुटुंबीयांवर आपल्या लाडक्या बब्या नावाच्या बैलाचा शुक्रवारी अचानक मृत्यूने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
गावा जवळच असलेल्या काळू नदीवर आपल्या बब्या नावाच्या बैलाला अंघोळीला नेल्यानंतर अचानक बैल पाण्यात खाली कोसळला, तो परत उठलाच नाही. डॉक्टरांच्या मते त्याला सौम्य हृदय विकाराचा झटका आला असावा असे सांगण्यात आले. मात्र गेले पाच वर्ष घरातील सदस्याप्रमाणे त्याचा सांभाळ जाधव कुटुंबियांनी केला होता. बैल शर्तीत आज पर्यंत अनेक शर्यतीत बब्याने बाजी मारली आहे. आज पर्यंत तो हरला नव्हता. आड्यावर त्याचे नाव महाराष्ट्रभर पसरलेले होते. घोड्याच्या पुढे धावणारा बब्या आज हरपला. फळेगावात लहान-थोरांसह सर्वांच्यात तोंडांत बब्याच नाव होत. छेकडे वाल्यांचा लाडका बब्या. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला हे कळताच घरातील लहान-थोरांसह गावातील चाहाते सर्वांनीच हंबरडा फोडला. तर परीसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपला उमद्या आणि जीव लावलेल्या बैलाचा मृत्यूने साऱ्यांनाच शोक अनावर झाला आहे.
आपल्या लाडक्या बब्या या बैलाची अंत्ययात्रा ही त्याला फुलांनी सजवून माणसाप्रणाणे काढण्यात आली. यावेळी शेतकरी जाधव कुटुंबातले सदस्य संजय जाधव, राजाराम जाधव, नितीन जाधव व प्रशांत जाधव, रवींद्र जाधव यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला अखेरचा निरोप दिला. पाच लाख किमतीचा व शेतकऱ्यांची खरी दौलत असलेले हे पशुधन गमावल्याचे दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी दिसत होते।


