प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम तर राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत तृतीय क्रमांकाचे मानकरी
जि.प.ने केले ९ हजार ३७६ कुटुंबांच्या घरांचे स्वप्न साकार
प्रमोद कुमार/महाराष्ट्र
ठाणे : विविध घरकुल योजनांना गतिमान करण्यासाठी शासनाने २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राबविलेल्या महाआवास अभियानात ठाणे जिल्हा परिषदेने कोकण विभागात अव्वल कामगिरी करत प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम क्रमांक तर राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. विभागीय आयुक्त, कोकण यांच्या शुभहस्ते ३ सप्टेंबर २०२१ रोजी कोकण भवन येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.
सर्वांसाठी घरे २०२२ हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून त्याअनुषंगाने राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केलेला आहे. त्याकरीता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करून गुणवत्तावाढीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हातील मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ,कल्याण,शहापूर आदि तालुक्यात महाआवास अभियान राबविण्यात आले।
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ६१८८ घरकुल पूर्ण करण्यात आली, यापैकी अभियान काळात ६४५ घरकुल पूर्ण करण्यात आली तर राज्य पुरस्कृत घरकुल योजनेमध्ये ३१८८ घरकुले पूर्ण करण्यात आली असून अभियान कालावधीमध्ये ४1२ घरकुले पूर्ण करण्यात आली. म्हणजे एकूण ९ हजार ३७६ घरकुल पूर्ण करण्यात आल्याचे प्रकल्प संचालक श्री. दादाभाऊ गुंजाळ यांनी सांगितले।

डेमो हाऊस आणि घरकुल मार्टची उभारणी
- घरकुल योजनेतर्गत लाभार्थी पक्की घरं बांधताना त्यांनी त्या ठिकाणची स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पारंपरिक बांधकाम पद्धती अनुसरून घरं बांधावीत यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ‘डेमो हाऊस’ बांधण्यात आले. तसेच घरकुलांसाठी लागणारी साधन सामग्री एकाच छताखाली मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ‘शाश्वत घरकूल मार्ट’ उभारले गेले. या दोन उपक्रमामुळे नागरिकांना घर बांधतांना आणि साधन सामग्री जमवताना सुलभ झाले. घरकुल मार्टमुळे महिलांना आर्थिक दृष्ट्या समक्ष बनण्यासाठी उपयुक्त झाले तर डेमो हाऊस मुळे 269 चौ.फूट घरकुल बांधकाम, भूकंप प्रतिरोधक आणि पर्यावरण पूरक घर उभारण्यास मदत झाली. घराला वारली कलेचा साज
अभियान काळात उभारण्यात आलेली घरं ही नाविन्यपूर्ण असावीत, एकरुपी असावीत यासाठी जिल्हाची जागतिक ओळख असलेल्या वारली कलेचे नक्षीदार रंगकाम घराला करण्यात आले. त्यामुळे घराचे रुपडेच पालटलेले पाहायला मिळाले।