दोषी अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा – बुधाराम सरनोबत
मुम्बई / संदीप शेंडगे
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा नजीक असलेल्या इंदिरानगर मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती सुरू असून नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत।
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे उलटली असली तरी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांना हक्काच्या मूलभूत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे ही अत्यंत शरमेची व लाजिरवाणी बाब असून दहा हजार लोकसंख्या असलेल्या इंदिरानगर मध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एकही नळ अस्तित्वात नाही अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. इंदिरानगर परिसरात अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांचा जास्त भरणा आहे. या ठिकाणी गोरगरीब अनुसूचित जाती जमातीचे शेकडो कुटुंब राहत असून विकास कामांपासून हा परिसर वंचित ठेवला जात आहे. या ठिकाणी कोणत्याही सोयीसुविधा अधिकारी पुरवीत नसुन दलित बहुल भाग असल्याने अधिकारी या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी केला आहे।
दैनंदिन जीवनामध्ये पाण्याला खूप महत्त्व आहे पाणी पिण्यासाठी कपडे धुण्यासाठी तसेच अनेक नैसर्गिक कामांकरिता पाणी आवश्यक आहे. परंतु कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी मध्ये असून सुद्धा दहा हजार लोकांना निष्क्रिय अधिकार्यांच्या कृपेने त्यांच्या हक्काचे पिण्याचे पाणी मिळत नसल्याने दलित समाजावर हा अन्यायच आहे म्हणून दोषी अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आदिवासी समाजाचे नेते आमदार हिरामण खोसकर देखील उपस्थित होते।
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे त्याचप्रमाणे इंदिरानगर ज्या विभागात येते या विभागाचे नगरसेवक शिवसेना पक्षाचेच होते. ज्या विधानसभेत इंदिरानगर येत आहे या विधानसभेचे आमदार शिवसेनेचे आहेत. त्याच प्रमाणे पालकमंत्री सुद्धा शिवसेनेचे आहेत तर राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत असे असताना इंदिरा नगर मधील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसेल तर अशी सत्ता काय कामाची असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत।
येत्या आठ दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रशासनाने न सोडविल्यास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असे आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष तथा माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे।