दोन आठवडे उलटूनही कारवाई नाही
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरू असून अ प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक उपायुक्त अनधिकृत बांधकामाकडे कानाडोळा करीत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्वच प्रभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामावर धडक निष्कासणाची कारवाई होत असताना अ प्रभाग क्षेत्र सहाय्यक उपायुक्त हातावर हात धरून बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अ प्रभाग क्षेत्रातील अटाळी मांडा-टिटवाळा बल्यानी आंबिवली मोहने यादव नगर मोहने गावठाण आदी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी व इमारतींचे बांधकाम सुरू असून अनधिकृत बांधकाम विभागतील कर्मचारी जाणीवपूर्वक अशा बांधकामांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या काही अंतरावर असलेल्या वडवली अटाळी रोड वरील भास्कर शाळेच्या बाजूला पाण्याच्या टाकी जवळ तसेच पाटील नगर तसेच मोहने परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून अ प्रभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम पथक प्रमुख तसेच सहाय्यक उपायुक्त या बांधकामावर कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. येथे राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारतींचे बांधकामे होत असून पालिका अधिकारी या बांधकामावर कारवाई करीत नसल्याने नागरिक अनेक तर्क वितर्क करीत आहेत. रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या पाटील नगर येथे मोठ्या प्रमाणात तीन मजल्याचे आरसीसी पद्धतीच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून या अनधिकृत बांधकामांला कोण अभय देत आहे याची चर्चा ‘अ’ प्रभाग क्षेत्रात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
अटाळी येथील अनधिकृत बांधकामावर कधी कारवाई होणार या बाबत अ प्रभाग क्षेत्राचे सायक उपायुक्त सुहास गुप्ते यांना विचारले असता सदरील अनधिकृत बांधकामाचा सर्वेअर मार्फत सर्व्हे करण्यात येत असून सर्व्हेचा अहवाल आल्यानंतर अनधिकृत बांधकामाला रितसर नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक उपायुक्त सुहास गुप्ते यांनी सांगितले आहे.असले तरी दोन आठवडे उलटूनही या बांधकाम कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे पालिका अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आहे का?
भू माफियांवर कारवाई करायला पालिका अधिकारी घाबरतात का?
आर्थिक साटेलोटे असल्याने पालिका अधिकारी अशा अनधिकृत बांधकामाकडे कानाडोळा करतात अशा अनेक तर्कवितर्कांना अ प्रभाग क्षेत्रात उधाण आले असून पालिका अधिकाऱ्यांनी अशा अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करून पालिका अधिकारी कोणाचाही दबावाला बळी पडत नसल्याचे दाखवून द्यावे लागेल. त्यामुळे पाठीशी घालण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर काय कारवाई होते याकडे अ प्रभाग क्षेत्रातील 90 हजार नागरिकांचे लक्ष लागले आहे.