ठाणे (प्रतिनिधी) : शहापूर तालुका ठाणे जिल्हा स्थित टेंभा गावात कचर्याचे मोठे साम्राज्य वाढले असून त्याचा प्रकोप झाला आहे. त्यामुळे परिसरात रोगराई तसेच साथीचे आजार पसरण्याची शक्यता वाढली असून ग्रामसेवक तसेच सरपंच कुठलीच कारवाई करत नसल्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येत आहे तसेच ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गावात या ठिकाणी इनामदार बंगल्याजवळ असलेल्या जागेत मोठ्या प्रमाणावर कचर्याचा ढीग साचलेला दिसून येतो. याबाबत वेळोवेळी सांगूनही कुठलीच कारवाई होत नाही. हा कचरा गावापासून दूरवर टाकण्यात यावा, अशी या भागातील नागरिकांची मागणी असूनही त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये साथीचे आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे. सर्दी, खोकला याबरोबरच डेंग्यू, न्यूमोनिया, टायफॉईड अशा प्रकारचे आजार होण्याच्या भीतीखाली लोक जगत आहेत. आजार झाले तर सर्वांवर उपचार करता येईल, अशी कुठलीच सोय गावात नाही. त्यामुळे आपल्या जिविताचे बरेवाईट होऊ शकते, अशी भीती लोकांना सतावत आहे.
याबाबत गावात नव्याने निवडून आलेले सरपंच तसेच ग्रामसेवक कुठलीही कारवाई करत नसल्यामुळे लोकांमध्ये त्याविषयी संताप व्यक्त होत आहे. त्यांनी कचर्याची व्यवस्था दूरवर केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. लवकरच याबाबत तहसिलदार आणि जिल्हाधिकारी यांनाही ग्रामस्थ लेखी निवेदन देणार आहेत.