मावीला सरकारकडून आर्थिक बळ मिळत नसल्यामुळे महिला सशक्तीकरणासाठी अधिक जोमाने काम करता येते – ज्योती ठाकरे
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जनता केंद्र सभागृह, तुलशीवाडी, ताडदेव, मुंबई सेंट्रल येथे प्रियदर्शिनी फाऊंडेशनचा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आझादी ७५ – मी भारतीय सन्मान पुरस्कार २०२१ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
सोहळ्याच्या उद्घाटक ज्योती ठाकरे (अध्यक्षा महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन राज्य मंत्री दर्जा), समारंभाध्यक्षा मेघना जोशी (अध्यक्षा प्रियदर्शीनी फाउंडेशन), भाऊ जगताप (कामगार नेते), संजीवनी पाटील (प्रसिध्द सिने-नाट्य अभिनेत्री, रात्रीस खेळ चाले फेम ‘वच्छी’), अनुराधा कशेळकर (सचिव महाराष्ट्र महिला काँग्रेस), डॉ. सागर नटराज (प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक), डॉ. प्रवीण नीचत (होप फाऊंडेशन अध्यक्ष), विनोद हिवाळे (संकल्प संस्था अध्यक्ष), सुभाषराव गायकवाड (आरोग्य मित्र), संगीता गुरव (समाजसेविका व उद्योजिका), संयोजक सूरज भोईर (सामाजिक कार्यकर्ते व संस्थापक सदस्य प्रियदर्शिनी फाऊंडेशन) यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थितांच्या हस्ते महात्मा गांधीच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून झाली. सूरज भोईर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करतानाच आपल्या मधुर वाणीतून स्वातंत्र्य चळवळीचे गीत सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
श्रुती लक्ष्मण हेंडवे या ११ वर्षीय मुलीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त खूप छान भाषण केले. उपस्थितांनी तिला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भाऊ जगताप यांनी महिला सशक्तीकरणासाठी महिला बचत गटांनी कसे कार्य करावे आणि शासकीय योजनांचा कसा लाभ घ्यावा यावर मार्गदर्शन केले. त्याचवेळी प्रियदर्शीनी फाउंडेशनच्या अध्यक्षा मेघना जोशी आणि सूरज भोईर यांना महिलांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्याची सूचना केली. सूरज भोईर आणि विनोद हिवाळे यांनी लगेच निर्णय घेऊन भाऊंचे मनोगत संपताच महिला कार्यशाळेचे निमंत्रण व्यासपीठावरून सर्वांना दिले.
महाराष्ट्र शासनाच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मावी) च्या १७ व्या अध्यक्षा आणि कार्यक्रमाच्या उद्घाटक ज्योती ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यातल्या बचत गटांचे विशेष कौतुक केले. आजच्या घडीला ९.५% परतावा महिला बचत गट करत आहेत, असेही त्यांनी सांगीतले. आपल्या भाषणात त्यांनी पुढे सागीतले की, महिला आर्थिक विकास महामंडळाला (मावी) शासनाचा निधी मिळत नाही. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त असं हे महामंडळ आहे. त्यामुळेच महिला सशक्तीकरणासाठी अधिक जोमाने काम करता येते.
कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या समाजसेवक, साहित्यिक, कलावंत, खेळाडू, वकील, डॉक्टर, आरोग्य मित्र यांचा त्यांनी केलेल्या विशेष व उल्लेखनीय कार्यासाठी ज्योती ठाकरे, संजीवनी पाटील तसेच भाऊ जगताप यांच्या हस्ते “भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आझादी ७५ – मी भारतीय सन्मान” पुरस्कार २०२१ सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
उपरोक्त पुरस्कारांत समाजकार्य या क्षेत्रात संकल्प संस्थेचे कार्यकर्ते सनोज वाल्मिकी आणि नसीम बानो खान यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आभार प्रदर्शन संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांनी केले. तर या कार्यक्रमाचे गुरुदत्त वाकदेकर
यांनी फार प्रभावशाली सूत्रसंचालन केले. सविता हेंडवे, सविता सावंत, कविता खोमणे, भारती तांबे आणि विनायक जवळकर यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी विशेष मोलाचे योगदान दिले.