किशोर पाटील/महाराष्ट्र
वाडा : शुक्रवारी
मोठ्या भक्तिभावाने वाजत गाजत आणलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी दुस-या दिवशी शनिवार ( ता.११) रोजी दिड दिवसांची स्थापना पूर्ण होताच भक्तिमय वातावरणात जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.
सध्या कोरोनाचा कठीण काळ सुरु असून यंदाचा गणेशोत्सव अनेक शासन निर्बंधांने वेढलेला आहे. असे असले तरी गणेश भक्तांनी शासन सुचनांचे पालन करीत आपल्यातील उत्साह मात्र कायम ठेवला असल्याचे दिसून आले.
गणपती बाप्पा मोरया या, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला असे जयघोष करीत बॅन्डबाजाच्या गजरामध्ये दिड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप देण्यात आला. वाड्यात ठिक- ठिकाणी नैसर्गिक पाण्याचे प्रवाह असलेल्या नदी,ओहल व तलाव अशा ठिकाणी भक्तिमय वातावरणात गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.
यंदाच्या गणेशोत्सवातील दिड दिवसांचा हा पहिलाच विसर्जन सोहळा असून तो आज (ता.११) रोजी भक्तीमय वातावरणात पार पडला आहे.घरगुती स्थापना केलेल्या गणरायांच्या मूर्तीचे तालुक्यात ठिक- ठिकाणी विधीवत विसर्जन करून जड अंतःकरणाने गणेश भक्तांनी निरोप दिला.