डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र
ठाणे : भिवंडी तालुक्यात आधारभूत खरेदीत आलेला भात भरडाईच्या नावावर काळ्याजारात जात असल्याचे समोर आले. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सांगलीतील राईस मिल च्या नावाने व्यापाऱ्यांना काळ्या बाजारासाठी देणारा भात नेणारे दोन ट्रक अडवले. जय किसान राईस मिल झिडके यांच्या दुगाड येथील गोदममधून मार्केटिंग फेडरेशन ठाणे यांच्या आदेशाने हा भात सांगली येथील श्री ज्योतिर्लिंग एंटरप्राइजेस या मिलर्स हे मिलिंगच्या नावाने हा भात उचलून व्यापाऱ्याना दिला जात होता. ठाणे-पालघर जिल्ह्यातील स्थानिक मिलर असताना सांगली, कोल्हापूर, गोंदिया सारख्या दुरच्या जिल्ह्यातील मिलर ला भरडाईचा ठेका देऊन वाहतूक भत्याच्या नावाने शासनाच्या कोट्यवधी रुपयांची लूट सुरू आहे हे श्रमजीवीने पुन्हा उघड केले आहे।
भिवंडी तालुक्यातील जय किसान राईस मिल च्या दुगाड फाटा येथे असलेल्या गोदामात येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आधारभूत खरेदी योजनेत भात दिला आहे. या भाताची मिलिंग करून हाच तांदूळ रेशन वर देण्याची योजना आहे. ह्या भाता पैकी तब्बल १०० टन भाताच्या भरडाईच्या ऑर्डर सांगलीच्या श्री जोतिर्लिंग इंटरप्रायझेस या कंपनीला दिली आहे. हा भात सांगलीला न जाता काळ्याबजारात विकायचा आणि मग हुबळी कर्नाटक इत्यादी ठिकाणचे नित्कृष्ट तांदूळ गरीब आदिवासी बांधवाना रेशनवर द्यायचे असा घोटाळा केला जातो. यापूर्वीही श्रमजीवी कार्यकर्त्यांनी असे घोटाळे उघड केले आहेत।
आज दुगाडच्या गोदामात श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार, जया पारधी, आशा भोईर, प्रदीप मांजरेकर,रुपेश जाधव, सुशांत चौधरी इत्यादी कार्यकर्त्यांनी धाड टाकून या गाड्या अडवल्या व भरलेल्या गाड्या रिकाम्या करायला लावल्या. काही दिवसांपूर्वी याच मिलर्स ने जय किसान राईस मिल च्या पडघा गोदमातून मोठ्या प्रमाणात भाताची उचल केली आहे. आज दुगाड इथूनच मार्केटिंग फेडरेशन ठाणेचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी (डीएमओ) केशव ताटे यांना कॉल करून याबाबत जाब विचारला. ताटे यांनी तातडीने ही उचल थांबवत यापुढे ठाणे-पालघर जिल्ह्यातील स्थानिक मिलर्स यांना देण्याबाबत निर्देश देण्याचे कबुल केले. याच जय किसान राईस मिल कडून आंबडीतील गोदमातून मागील वर्षी हंगाम २०१९-२० मध्ये रायगड येथील धनंजय राईस मिलर्स ( व्यापारी) यांनी उचल केलेल्या ४० लाख रुपये किंमतीच्या शेकडो क्विंटल भाताच्या बदल्यात शासनाला तांदूळ जमा केलेला नाही ,याबाबतही श्रमजीवी ने अधिकाऱ्यांना दणका दिलेला. या ४० लाखाच्या भाताचे काय झाले? मात्र याचीही चौकशी करण्याचे काम हे अधिकारी करत नाही हे विशेष आहे।
श्री ज्योतिर्लिंग इंटरप्रायझेस या एकट्या मिलर ने जर हा १०० टन भात सांगलीला नेला तर त्याचा वाहतूक खर्च हा मिलर तब्बल १७ ते १८ लाख रुपये शासनाकडून घेणार आहे. पण हाच भात जर ४० ते ६० किलोमीटर अंतरात मिलर्स ला भरडाईसाठी दिला तर केवळ अडीच ते तीन लाख रुपयांचा वाहतूक खर्च लागेल. विशेष म्हणजे हे मिलर्स भरडाई न करता हा माल थेट विक्री करून वाहतूक खर्च, बारदान, भरडाई भत्ता इत्यादी घेऊन शासनाला चुना तर लावतात सोबत यांच्या या घोटाळ्यात गरीब आदिवासींच्या रेशन वर नित्कृष्ट तांदूळ येत असल्याने श्रमजीवी संघटनेने संताप व्यक्त केला।
याच प्रकारे आदिवासी विकास महामंडळ जव्हार येथील अधिकारी देखील अशाच प्रकारचे भाताची डिलिव्हरी ऑर्डर जवळ अंतरावरील मिलर्स उपलब्ध असतात, मिलिंग करण्यास तयार असताना देखील त्यांना डावळून दूर अंतराच्या मिलर्सना ऑर्डर देऊन शासनाच्या कोट्यवधी रुपये वाहतूक भत्याची लूट आताही सुरू आहे।