30.5 C
Madhya Pradesh
July 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20230312 WA0007
महाराष्ट्र

साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी हिंदी साहित्यिक माधव कौशिक

Bundelikhabar

6 / 100 SEO Score

*रंगनाथ पठारे पराभूत; उपाध्यक्षपदी प्रथमच महिला*

नवी दिल्ली (गुरुदत्त वाकदेकर) : देशाच्या साहित्य क्षेत्रात अतिशय महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ हिंदी साहित्यिक माधव कौशिक विजयी झाले. या निवडणुकीत ज्येष्ठ मराठी साहित्यिक रंगनाथ पठारे पराभूत झाले. त्यांना केवळ तीन मते मिळाली.

साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षपदी दिल्ली विद्यापीठाच्या प्रोफेसर कुमुद शर्मा यांची निवड झाली आहे. साहित्य अकादमीच्या इतिहासात पहिल्यांदा या पदावर एका महिलेची निवड झाली आहे. त्यांनी राधा कृष्णन यांचा केवळ एका मताने पराभव केला. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत झाली. त्यात रंगनाथ पठारे यांच्यासह माधव कौशिक आणि कन्नड साहित्यिक मल्लपुरम व्यंकटेश रिंगणात होते. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव म्हणाले की, निवडणूक निकाल जाहीर करताना निवडणुकी दरम्यान सर्व ९९ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात कौशिक यांना ६०, मल्लपुरम व्यंकटेश यांना ३५, तर पठारे यांना फक्त ३ मते पडली. उपाध्यक्षपदासाठी कुमुद शर्मा आणि कृष्णन रिंगणात होते. यात अध्यक्षपदी माधव कौशिक तर उपाध्यक्षपदी कुमुद शर्मा यांची निवड झाली. माधव कौशिक आता मावळते अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

१२ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रसिद्ध कन्नड साहित्यिक प्रा. चंद्रशेखर कंबार यांची साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. कंबार यांनी डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांची जागा घेतली होती. त्यावेळी ते अकादमीचे उपाध्यक्ष होते.

साहित्य अकादमीच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत माधव कौशिक यांची अध्यक्षपदी तर कुमुद शर्मा यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. नवी दिल्ली येथील रवींद्र भवन येथे झालेल्या साहित्य अकादमीच्या कार्यकारिणी निवडणुकीत ज्येष्ठ साहित्यिक आणि अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक यांची अध्यक्षपदी निवड झाली. या निवडणुकीत माधव कौशिक, मल्लपुरम व्यंकटेश आणि रंगनाथ पठारे हे तीन उमेदवार रिंगणात होते. माधव कौशिक हे ज्येष्ठ कन्नड साहित्यिक चंद्रशेखर कंबार यांची जागा घेतील. अध्यक्षपदासाठी केवळ उपाध्यक्ष निवडला जातो, अशी साहित्य अकादमीची परंपरा आहे.

साहित्य अकादमीच्या निवडणुकीत सर्व २४ भारतीय भाषांच्या प्रमुखांसाठीही मतदान झाले.

साहित्य अकादमीच्या नव्या पहिल्या महिला उपाध्यक्षा प्रा. कुमुद शर्मा अवघ्या एका मताच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. ३० मार्च १९६० रोजी जन्मलेल्या कुमुद शर्मा २००६ पासून दिल्ली विद्यापीठात अध्यापन करत आहेत. प्रसार भारतीची कोअर कमिटी, एनसीईआरटीचे सल्लागार, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची शैक्षणिक परिषद यासह भारतातील विविध साहित्यिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. कुमुद शर्मा यांना त्यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक योगदानासाठी भारतेंदू हरिश्चंद्र पुरस्कार, बालमुकुंद गुप्ता पत्रकारिता पुरस्कार, दामोदर चतुर्वेदी स्मृती सन्मान आणि साहित्य श्री यासारख्या सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे.

साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. १९६३ मध्ये त्यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली. मे १९६४ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर जनरल कौन्सिलने डॉ. एस. राधाकृष्णन यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली. फेब्रुवारी १९६८ मध्ये, नव्याने स्थापन झालेल्या परिषदेने डॉ. झाकीर हुसेन यांची साहित्य अकादमीचे अध्यक्ष म्हणून निवड केली. मे १९६९ मध्ये त्यांच्या निधनानंतर डॉ. सुनीती कुमार चॅटर्जी यांची अध्यक्षपदी निवड झाली. फेब्रुवारी १९७३ मध्ये त्यांची पुन्हा सभापती म्हणून निवड झाली. मे १९७७ मध्ये त्यांच्या निधनानंतर उपराष्ट्रपती प्रा. के. आर श्रीनिवास अय्यंगार यांना साहित्य अकादमीचे कार्यवाह अध्यक्ष करण्यात आले. फेब्रुवारी १९७८ मध्ये प्रा. उमाशंकर जोशी यांची अध्यक्षपदी निवड झाली. फेब्रुवारी १९८३ मध्ये प्रा. व्ही. के. गोकाक यांची अध्यक्षपदी निवड झाली. फेब्रुवारी १९८८ मध्ये डॉ. बिरेंद्रकुमार भट्टाचार्य, १९९३ मध्ये प्रा. यु. आर. अनंतमूर्ती, रमाकांत रथ १९९८ मध्ये, प्रा. गोपीचंद नारंग २००८ मध्ये, सुनील गंगोपाध्याय ऑक्टोबर २०१२ मध्ये गंगोपाध्याय यांच्या निधनानंतर प्रा. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांची प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. १८ फेब्रुवारी २०१३ रोजी विश्वनाथ प्रसाद तिवारी यांची अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झाली. २०१८ मध्ये प्रा. चंद्रशेखर कंबार यांची अकादमीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

*भालचंद्र नेमाडेही झाले होते पराभूत*

साहित्य अकदमीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यापूर्वी भालचंद्र नेमाडे रिंगणात उतरले होते. मात्र, त्यांना फक्त चार मते मिळाली. त्यांनी प्रचार करण्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचे मानले गेले. त्यामुळे यंदा पठारे यांनी जोरदार प्रचार केला. मतदारांशी संपर्क साधला होता. मात्र, तरीही त्यांना अपयश आले.


Bundelikhabar

Related posts

तरुण युवकांनी रात्रीच्या वेळी आपल्या गावचे संरक्षण करण्यासाठी पोलिस यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे – मिथुन घुगे

Bundeli Khabar

शेमारू हिंदू भजन स्पीकर’ से त्यौहारों के उल्लास को बनाएं विशेष

Bundeli Khabar

वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मिथुन पाटील यांची बिनविरोध निवड

Bundeli Khabar
error: Content is protected !!