मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दिवाळखोरीमुळे बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या शालिनी सहकारी बँकेने प्रगतीपथावर वाटचाल करत आता तिची वाटचाल नफ्याकडे सुरु आहे, बहुजन समाजाच्या विकासासाठी बँकेने प्रयत्नपूर्वक कार्य केले आहे, मोबाईल बँकिंगसारख्या आधुनिक तंत्राचा अवलंबदेखील केला जात आहे, यापुढील काळात प्रत्येक सभासदाने आपली बँक यापुढेही प्रगतीपथावर ठेवावी, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब देसाई यांनी व्यक्त केले. शालिनी सहकारी बँकेच्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या शीव येथील शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेल्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
मुंबईतून श्रमजीवी आणि कष्टकरी वर्गाचे स्थलांतर याचा परिणाम गिरणगावातील अनेक पतसंस्थांवर झाला आहे, या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या शालिनी सहकारी बँकेने केलेली प्रगतशील वाटचाल ही गौरवास्पद आहे, असे विचार मुंबै बँकेचे संचालक नंदकुमार काटकर यांनी सांगितले. सभासद तसेच कर्मचारी वर्गाने आपले नेटवर्क वाढवणे तसेच स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी नवे मार्ग अवलंबिले पाहिजे, असे विचार बँकेचे उपाध्यक्ष बळवंतराव पवार यांनी व्यक्त केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शितोळे यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तोट्यात असलेली बँक नफ्यात आणत असतानाच मधल्या काळात कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागला. असे असूनही बँकेच्या ठेवीचा टप्पा २० कोटी ६२ लाखांपर्यंत गेला आहे तर एनपीए टक्केवारी १५ टक्क्यांपर्यंत आणण्यास व्यवस्थापनाला यश आले आहे. मागील आर्थिक वर्षात बँकेला १ कोटी १८ लाख निव्वळ नफा झाला असून आता बँक ब वर्गात असून येत्या आर्थिक वर्षात अ वर्गात कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेचे सूत्रसंचालन कर्ज अधिकारी जगन्नाथ देसाई यांनी केले. सभेस संचालक वरुण देसाई, संचित पाटील, आरती गावकर, मनीषा शितोळे, अतुल पोटे, प्रमोद पाटील तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home » बहुजन समाजाच्या विकासासाठी प्रयत्नपूर्वक असे शालिनी सहकारी बँकेचे कार्य – अॅड. आप्पासाहेब देसाई
Related posts
- Comments
- Facebook comments