मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केलेल्या मनोहर धोत्रे यांच्या “मी जगलो असा की” ह्या चरित्रात्मक पुस्तकाचा आणि श्रमश्रेम प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या लीला जंजिरे यांच्या “ती एक मानिनी” ह्या कथासंग्रहाचा संयुक्त प्रकाशन सोहळा १ ऑक्टोबर २०२२ रोजी काळाचौकी येथील लक्ष्मीबाई पाष्टे सभागृहात घरगुती वातावरणात पार पडला.
सदर समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार काशिनाथ माटल, साहित्यिक अविनाश दौंड, योगेश विचारे आणि डॉ. संयोगिता विचारे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना सोनल आजगावकर यांनी नेमक्या शब्दांत केली.
ह्या दोन्ही पुस्तकांचे मुखपृष्ठ जनार्दन जंगम यांनी तयार केले आहे. त्याबद्दल त्यांनी सविस्तर भाष्य केले आणि दोन्ही लेखकांना तसेच त्यांच्या पुस्तकांना शुभेच्छा दिल्या.
अविनाश दौंड यांनी मनोहर धोत्रे यांच्यासोबत एकत्र काम केलेलं असल्यामुळे ह्या चरित्रात्मक पुस्तकात आलेल्या घटनांचा धांडोळा मांडला. तर काशिनाथ माटल यांनी आपण धोत्रेंच्या बहुआयामी प्रतिभेने कसे प्रभावित झालो हे काही प्रसंगांच्या उदाहरणावरून सभागृहासमोर मांडले. दोन्ही वक्त्यांनी लीला जंजिरे यांच्या कथासंग्रहावरही सविस्तर मनोगत व्यक्त केले.
पुस्तकाच्या स्वागताला आणि त्यांच्या सत्काराला लीला जंजिरे यांनी उत्तर दिले. त्यांनी आपलं बालपण, शिक्षण, गावाकडून शहराकडे प्रयान, शिक्षकीपेशा, कौटुंबिक जीवन ते साहित्यिक प्रवास असा ७१ वर्षांचा लेखाजोखा मांडला. भावनिक प्रसंग असल्यामुळे आपोआपच त्यांचा स्वर कातर झाला होता. तर मनोहर धोत्रे यांनी ह्या पुस्तकांशी संबंधित सर्वांचे आभार मानले. अविनाश दौंड आणि मनोहर मांदाडकर हे सहकर्मी असल्यामुळे तसेच दोघांनाही साहित्यिक जाण असल्यामुळे धोत्रे यांचं लिखाण त्या दोघांनी प्रथम वाचणं हे ओघानेच येत असल्याचा दाखलाही त्यांनी दिला.
मनोहर धोत्रे यांच्या “मी जगलो असा की” आणि लीला जंजिरे यांच्या “ती एक मानिनी” या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे समयसूचक सूत्रसंचालन मंगेश शेटे तर आभारप्रदर्शन मनी अार्ट, मुंबईचे सचिव विजय पेडणेकर यांनी केले.
प्रकाशन समारंभासाठी श्रमश्रेम प्रकाशनच्या श्रद्धा धोत्रे, धोत्रे यांचे कार्यालयीन सहकर्मी, धोत्रे तसेच जंजिरे यांचे कुटुंबीय, साहित्यिक रसिक तसेच विभागीय नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

