शंभर टक्के लसीकरण केल्याबद्दल नारिवली ग्रामपंचायतीचा
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते गौरव
प्रमोद कुमार
ठाणे : कोवीड संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार गावातील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण केल्याबद्दल देशाच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत मुरबाड तालुक्यातील नारिवली ग्रामपंचायतीचा आज केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
देशाच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) समितीच्या बैठकीत आज हा सत्कार समारंभ झाला. नारिवली गावाच्या सरपंच देवयानी भोईर, उपसरपंच कल्पेश सोरसे, ग्रामसेवक निलेश गोरले, सदस्य योगेश भोईर यांनी हा सत्कार स्विकारला.
यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते आदी यावेळी उपस्थित होते.
नारिवली ग्रामपंचायतीने गावातील सर्व नागरिकांना 100 टक्के पहिला डोस तर 98 टक्के दुसरा डोस दिला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. उपजिल्हाधिकारी श्री. ठोंबरे म्हणाले की, देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोवीड प्रतिबंध लसीकरण मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात आला आहे. यापुढेही जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायती लसीकरण मोहिमेत चांगले काम करतील, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

