किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : महाराष्ट्र राज्याची रस्ते विकास योजना २००१ ते २०२१ च्या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक तालुक्यातील जास्त वर्दळ असलेले अंतर्गत रस्ते हे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून घोषित करण्यात यावेत असे राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णय क्रमांक रवियो-२०१९/प्र.क्र.७८/नियोजन-२ ह्या अध्यादेशाद्वारे पारित करण्यात आले. सर्व नवीन जिल्हा मार्ग दर्जेन्नोत करण्यात यावेत असे स्पष्ट आदेश देऊन सुद्धा भिवंडी-कारीवली, चावे – कुरुंद, वज्रेश्वरी- पाच्छापूर, चिंचवली-शिरगाव हे प्रमुख जिल्हा मार्ग आज पण मरणयातना भोगीत आहेत.
ह्या सर्व नवीन जिल्हा मार्गांची बांधणी नव्याने करण्यात यावी ह्याबाबतची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री विलास कांबळे यांना ठाणे येथील कार्यालयात भेटून निवेदन देत मनसेचे विद्यार्थी तालुका अध्यक्ष श्री. परेश चौधरी व विभाग अध्यक्ष ऍड.श्री. सुनील देवरे ह्यांनी मागणी केली. तालुक्यातील एकूण ८० किमी इतक्या रस्त्याचे लवकरच मोजमाप करून त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी दिले.