ब्युरो/महाराष्ट्र
मुंबई : अंबरनाथ येथील समाजसेवक शिक्षक विलास सोमा आंग्रे यांना कोरोना काळात समाजाची अविरत सेवा केल्याबद्दल मुंबई येथील राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांच्या हस्ते समाजसेवा रत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेल्या दोन वर्षापूर्वी कोरोना या विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले होते. झपाट्याने पसरणाऱ्या या विषाणूने अवघ्या जगाला आपल्या विळख्यात घेतले होते. या अत्यंत घातक विषाणूमुळे संपूर्ण भारतासह जगभरात लाखो लोकांचे बळी गेले होते.
हा विषाणू इतका घातक होता की जर कोणाला या विषाणूची बाधा झाली कि त्याचा मृत्यू अटळ होता तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही या विषाणूची बाधा होण्याची शक्यता होती त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना विलगीकरण कक्षात ठेवावे लागत होते. जवळचे नातेवाईक भाऊ बहिण सुद्धा या रुग्णाच्या जवळ यायला घाबरायचे तसेच अशा रुग्णास बरोबर कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करत नव्हते अशा कठीण परिस्थितीत पेशाने शिक्षक असलेले व गेल्या पंचवीस वर्षापासून कल्याण बदलापूर अंबरनाथ डोंबिवली शहापूर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात समाजसेवा करीत असलेले विलास आंग्रे हे समाजासाठी धावून आले. आपल्या जीवाची कोणत्याही प्रकारची पर्वा न करता त्यांनी कोरोना काळात अनेक गोरगरीब लोकांची सेवा केली अनेकांना ऍम्ब्युलन्स मिळवून देणे हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणे गोरगरीब आदिवासी समाजाला अन्नधान्य वाटप करणे ऑक्सिजनबेड उपलब्ध करून देणे मोफत सॅनिटायझर वाटप करणे तसेच शासन आणि प्रशासनाला मदत करून कोरोना प्रतिबंधित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.
या कार्याची दखल घेऊन अंबरनाथ कल्याण ठाणे येथील अनेक संस्थांनी आंग्रे यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य सरकार कडून त्यांचे नाव कोरोना योद्धा समाजसेवा रत्न पुरस्कारासाठी देण्यात आले होते. आंग्रे यांच्या कार्याची योग्य ती दखल घेऊन सोमवारी ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते मुंबई राजभवन येथे विलास सोमा आंग्रे यांना कोरोना योद्धा समाजरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने अंबरनाथ करांच्या शिरपेचात आणखीन एक सन्मानाचा तुरा रोवला गेल्याचे बोलले जात आहे. त्यांना या पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात असून योग्य व्यक्तीचा सन्मान झाला असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.