चामिलपाडा आदिवासी पाड्यात विविध सामाजिक उपक्रम व साहित्य वाटप
ब्यूरो/महाराष्ट्र
पालघर : जव्हार तालुक्यातील चमिलपाडा या आदिवासी पाड्यावर गरीब आणि गरजू लोकांना आपले मानवाधिकार फाउंडेशनचे संचालक दिपेश पष्टे व दिवेश पष्टे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा सामर्थ्य प्रतिष्ठान, आपले मानवाधिकार फाउंडेशन, कृष्णा आय व्हिजन, माझे माहेर सेवा भावी संस्था, क्रांतिज्योती सावित्रीबाई सोशल ग्रुप व भागीरथी भोईर प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून विविध सामाजिक उपक्रमा सोबतच शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आपले मानवाधिकार फाउंडेशन चे संचालक दिपेश पष्टे व जव्हार पंचायत समिती सभापती सुरेश कोरडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
जनतेला आपले अधिकार कसे मिळवता येतील, कर्तव्ये काय आहेत अशा विविध विषयांची माहिती पष्टे यांनी दिली. युवा सामर्थ्य प्रतिष्ठान मार्फत ग्रामीण भागातील जनता कशी विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल या साठी प्रयत्न करणार असल्याचे मुकेश वातास यांनी सूचित केले तर कृष्णा आय व्हिजनने डोळ्यांच्या विकारा विषयी मार्गदर्शन केले. माझे माहेर सेवा भावी संस्थेकडून ग्रामीण महिलांना एकत्रित करून त्यांना स्वयंरोजगार कशा मिळवून देता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. क्रांतिज्योती सावित्रीबाई सोशल ग्रुपच्या अध्यक्षांनी शैक्षणिक माहिती देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करून भविष्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर राबवून शिक्षणाची क्रांती घडवून आणणार असल्याचं आवर्जून सांगितले. तसेच जोयांट ग्रुप च्या डॉ.श्रीवास्तव यांनी आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करिता आपल्या भागात नेहमीच येत राहू आणि मुलांचा शिक्षणातील कल वाढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तर सभापती कोरडे यांनी आमच्या ग्रामीण भागातील अशा समाजपयोगी उपक्रमांसाठी लागेल त्या प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहोत असे यावेळी सांगितले.
या सामाजिक उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप, गरजूंना मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, कपडे वाटप करण्यात आले. यावेळी सभापती सुरेश कोरडा यांनी आदिवासी ग्रामीण भागात उपक्रम करून गरीब जनतेच्या जीवनाला हातभार लागत असल्याने सर्व संस्थांचे आभार मानले. तसेच मान्यवरांचे स्वागत करतांना गावकऱ्यांनी आपल्या आदिवासी पारंपारिक पद्धतीने वेशभूषा परिधान करून तारपा नृत्य, वाघोबा व बैल यांच्या मुखवट्यांचे दर्शन देऊन जल्लोषात स्वागत केले.
या कार्यक्रमप्रसंगी सरपंच धवळ्या दिघा, युवा सामर्थ्य प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष मुकेश वातास,आपले मानवाधिकार फाउंडेशनचे सहसंचालक वैभव हरड, राष्ट्रीय सहसचिव गणेश तांबे, राज्य संपर्क प्रमुख दिवेश पष्टे व इतर पदाधिकारी, माझे माहेर सेवा भावी संस्थेच्या अध्यक्षा सुषमा कासारे, कृष्णा आय व्हिजनचे कल्पेश पष्टे, क्रांतीज्योती सावित्रीबाई सोशल ग्रुपच्या अध्यक्षा अनिता सातपुते आणि जायंट ग्रुपचे डॉ. श्रीवास्तव तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि गावातील नागरिक उपस्थित होते.