किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : महानगर पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे देयके त्वरीत देण्याची मागणी भिवंडी मुन्सीपल कर्मचारी यूनीयनचे अध्यक्ष राजेंद्र काबाडी व सचिव सुनिल वंगार यांनी लेखी निवेदनाद्वारे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत असणारे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना आवश्यक ती आर्थिक देयके त्वरीत मिळणे हा त्यांचा अधीकार असताना महानगरपालिकेच्या आस्थापना विभागातील भोंगळ कारभारामुळे त्यांना आस्थापना व भविष्य निर्वाह निधी विभागाचे उबंरठे झिजवावे लागतात तसेच तगादाही लावावा लागतो तरीही ते वेळेवर मिळत नाही तसेच कर्मचाऱ्यांचे वारसा हक्क प्रकरणे शासन परीपत्रकाप्रमाणे ३० दिवसांत निकाली काढणे आवश्यक असताना ६ ते ७ महीने लागत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे तरी या दोन्ही प्रकरणात आयुक्त सुधाकर देशमुख यांनी योग्य निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली असुन आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वाचें लक्ष लागले आहे.