जमिनी लुटण्याचा अनोखा प्रकार…
ब्यूरो/महाराष्ट्र
पालघर : वडिलोपार्जित व्यवसाय समजून स्थानिक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी चा गैरफायदा घेऊन त्यांच्या जमिनी लुबाडत असल्याचे काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघड झाले आहे. यामध्ये त्यांचे सहकारी तसेच काही शासकीय व प्रशासकीय अधिकारी सुद्धा सामील आहेत, असे सांगितले जात आहे.
वडील किसन राऊत यांनी आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना पैशाचे आमिष दाखवून जमिनी घेतल्या आहेत. काही कालांतराने त्याच जमिनी पैसे थकीत झाले म्हणून त्यांच्याकडे असलेली संपूर्ण जागा खोटी कागदपत्रे सादर करून तसेच अधिकार्यांच्या सहकार्याने नावावर करत असत. आतापर्यंत परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किंमत देऊन खोटे कागदपत्र सादर करून आपल्या नावावर करून घेतले आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मुलगा अजय राऊत वाटचाल करत आहे. अशाप्रकारची वाटचाल करत असताना परिसरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहेत. असे असताना त्याच्यावर व इतर साथीदारांवर कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नाही व अटक केली जात नाही, हे मोठे विशेष आहे. अशा परिस्थितीत आता स्थानिक नागरिक त्रस्त होऊन घाबरून गेले आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारची तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत.
वाडा तालुक्यातील केळठण गावामधील हरेश्वर पाटील या शेतकऱ्याची वडिलोपार्जित जमीन सर्वे नंबर ४०४ जेव्हा अजय राऊत याच्या नावावर आहे, असे समजले त्यावेळी एकच खळबळ उडाली आणि होत असलेले प्रकार उघडकीस आले. सदरच्या सर्वे नंबर ची जमीन राऊत यांचे वडील किसन राऊत यांनी खोटी संमतीपत्रे दाखवून मुलगा अजय राऊत या नावाने विकत घेतली असे दाखवले. संबंधित जागेचे खरेदीखत मध्ये कोणत्याही प्रकारचे संमतीपत्र जोडले नाही; मग निबंधकांनी जागा नावावर केलीच कशी? निबंधकांनी यामध्ये गैरव्यवहार तर केले नाहीत ना? की अजय राऊत यांनी अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून फसवणूक केली? असे विविध प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. त्याचप्रमाणे संबंधित प्रकरणाची व अजय राऊत यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची योग्य ती चौकशी केली जाईल का? व ज्यांच्या जमिनी लुबाडल्या आहेत त्यांना पुन्हा मिळणार का? असे अनेक प्रश्न फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहेत.
“आमच्याकडे जमिनीचे सर्व कागदपत्र आहेत राऊत याने शेकडो शेतकऱ्यांना फसवून करोडोंची मालमत्ता जमा केलेली आहे. आम्ही याबाबत मा.मुख्यमंत्री, मा.गृहमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहोत. आम्हाला न्याय मिळावा आणि परिसरातील फसवणूक झालेल्या सर्व गरीब शेतकऱ्यांच्या हस्तक्षेप केलेल्या जमिनी मिळाव्यात तसेच त्याच्या संपूर्ण मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत करणार आहोत”: पिडीत शेतकरी