महाविकास आघाडी सरकारने ताईंच्या धडाडीच्या कार्याचा केला यथोचित सन्मान…!
विशेष प्रतिनिधी/डॉ.दिपेश पष्टे
महाराष्ट्र शासनाच्या महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)च्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या व आपल्या अनोख्या कार्यपद्धतीने राज्याच्या गावपातळी पासून ते जागतिक स्तरापर्यंत ‘माविम’ ची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कार्यरत अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकारने अध्यक्ष पदाची मुदतवाढ देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे.
२४ फेब्रुवारी १९७५ साली स्थापन झालेली ‘महिला आर्थिक विकास महामंडळ’ ही महाराष्ट्र शासन अंगीकृत महिलांच्या उत्थानासाठी काम करणारी राज्याची महिला विकासाची शिखर संस्था आहे. भारताचं पहिलं महिला राष्ट्रपती पद भूषविणाऱ्या मा.श्रीमती.प्रतिभाताई पाटील या ‘माविम’ च्या पहिल्या अध्यक्षा होत्या. राज्याच्या विधानपरिषदेच्या उपसभापती असणाऱ्या डॉ.नीलमताई गो-हे, नुकत्याच राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेल्या श्रीमती रजनीताई पाटील, अलीकडच्या काळात श्रीमती प्रभा ओझा यांच्यानंतर ’माविम’च्या मान्यवर अध्यक्षाच्या रांगेत ठाकरे या १८ व्या अध्यक्षा म्हणून धुरा सांभाळत आहेत.
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांनी ज्योती ठाकरे या निष्ठावंत, मेहनती व प्रामाणिक कार्यकर्तीला उत्कृष्ट व धारदार वक्तृत्व, नेतृत्व पेलण्याची अनोखी हातोटी आणि राज्यातील स्त्री शक्तीला आपल्या ओजस्वी वाणीने कृतीसह जिंकणारे कर्तृत्व हे गुण हेरुन महाराष्ट्र शासनाच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सप्टेंबर २०१८ रोजी सोपविली.
जेथे ६० वर्षात शिवसेनेचा भगवा फडकला नव्हता अश्या कुडूस गटात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेतर्फे ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून पेशाने मूळ शिक्षिका असलेल्या ज्योती ठाकरे २०१२ साली प्रथमतः निवडून आल्या व राजकारणातील त्यांची घौडदौड समाजकारणाने निरंतर सुरु झाली. प्रथम ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि जिल्ह्याच्या विभाजनानंतर पालघर जिल्हा नियोजन समिती सदस्यपद, पक्षाकडून पालघर जिल्हा महिला संघटक आदी जबाबदारी सांभाळून त्यांनी तळागाळातील महिला शक्तीला संघटीत केले. आपल्या प्रामाणिक आणि अभ्यासू वृत्तीने हाती घेतलेल्या प्रत्येक समस्येचा पाठपुरावा करत जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय दिला. त्यांच्या या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर पालघर लोकसभा समन्वयक तसेच जालना आणि हिंगोली जिल्ह्याच्या संपर्क संघटक म्हणून दिलेली जबाबदारीही त्या निष्ठेने पार पाडत आहेत. माविमला
इतर महामंडळासारखा निधी नसतांना ठाकरे यांच्या सक्षम व कार्यकुशल नेतृत्वांतर्गत या महामंडळाने राज्यभरातल्या महिलांच्या उत्थानासाठी सुमारे ४२९२ पेक्षा जास्त कोटींचे कर्ज विविध बँकांना लिंकेज करत बचत गटांच्या माध्यमातून थेट गरजू महिलांपर्यंत पोहचविले असून कर्जाची परतफेड सातत्याने ९९.५% राखण्यात यश मिळवले. अगदी कोरोना काळातही ९८% इतकी लक्षणिय परतफेड माविम स्थापित बचत गटातील महिलांनी केली. केवळ बचत गटातील महिलांपुरता सिमित न राहता जन्माला आलेल्या मुलीपासून, युवती, महिला आणि उतारवयातील वृध्दांप्रती माविम कटीबध्द आहे हे त्यांनी मागील तीन वर्षाच्या कारकिर्दीत नाविण्यपूर्ण कल्पक उपक्रम सुरू करून सिध्द केले आहे. कोविड काळातही बचत गटातील महिलांचे मनोबल उंचावत या ‘स्वयं सहाय्य बचत गटांनी’ माविमच्या सहकार्याने घेतलेली ”समाज सहाय्य बचत गट” ही झेप म्हणजे ज्योती ठाकरे यांच्या सर्वव्यापी व सर्वसमावेशक कार्यप्रणालीची झलक आहे. प्रसिध्दीच्या मागे न लागता अविरतपणे काम करणा-या, साधी राहणी व उच्च विचारसरणी जोपासणा-या उच्च विद्याविभूषित असून त्यांच्यावर शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांचे संस्कार झालेले आहेत. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी अनेक पुरस्कारांवर नाव कोरले असून विविध क्षेत्रातील प्रज्ञावंत मान्यवरांच्या हस्ते त्या सन्मानित झाल्या आहेत. ज्योती ठाकरे उत्तम कवयित्री असून त्यांची साहित्याची जाण वाखाणण्याजोगी आहे. मुंबई आकाशवाणीवर काही काळ वृत्तनिवेदिका म्हणून कार्यरत असणा-या ठाकरेकडे प्रत्येक विषयाची प्रगल्भता व जिज्ञासूवृत्ती दिसून येते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत माविमला राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले असून त्याचे श्रेय स्वतःकडे न घेता ”हे यश म्हणजे माविमच्या टीम वर्कचे अर्थात संघटीत शक्तीचे फलित आहे” यावर ज्योती ठाकरे ठाम आहेत. अशा प्रेमळ, मनमिळाऊ, हस-या, प्रसन्नचित्त, बोलक्या व मोकळया स्वभावाच्या निगर्वी ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांनाही आपल्याशा वाटतात. म्हणूनच माविमच्या अध्यक्षपदावर पुन्हा झालेल्या फेरनियुक्तीमुळे माविम परिवारासह राज्यातील स्त्रीशक्तीत आनंदाचे वातावरण आहे हे निर्विवाद!

