शब्दांकन:वैष्णवी बांगरे
डोंगरदऱ्यांतून नागमोडी वळणे घेत वाहणाऱ्या नदीचा जसा चढउतार असतो ना अगदी तसंच आपल्या आयुष्याचं आहे. माणसाचे आयुष्य चढउतारांनीच बनलेले आहे. आयुष्य म्हणजे संघर्षाचं एक रणांगणच. जन्माला आल्यापासून आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत माणूस संघर्षच करत असतो. या संघर्षात जो टिकला तोच जगला. कधी कधी मनात एक प्रश्न येतो, माणूस जगतो ते कशाकरीता? जीवन जगणं म्हणजे नेमकं काय? फक्त पैसे कमावून एक चांगली सरकारी नोकरी करून आपलं आणि आपल्या परीवाराचं पोट भरणं म्हणजे जगणं आहे का? तसं बघायला गेलं तर आजच्या मानवाची जीवन जगण्याची व्याख्या हीच आहे. ‘आपण भलं, आपलं परीवार भलं.’ माझं दुसऱ्यांशी काहीही संबंध नाही. पण ज्या समाजात आपण आपल्या जन्मापासून राहत आहोत, त्या समाजासाठी काहीतरी चांगले कार्य करावं हा विचार खूप कमी लोकांच्या मनात येतो।
आपल्या आयुष्याचं सार्थक कशात आहे हो ? आपण जन्माला आलो आहोत तर आपल्या जन्माचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे ना. पण फक्त स्वत:च भलं झालं म्हणजे आयुष्याचं सार्थक झालं असं समजायचं का?
मला वाटतं, “आयुष्याचं सार्थक तेव्हाच होणार जेव्हा आपण निस्वार्थी भावनेने एखाद्याची मदत करू आणि त्याच्या चेहर्यावरचं तो आनंद पाहून आपल्याला आनंद होईल. कधी एखाद्या भुकेल्याला आपल्या ताटातलं थोडंसं अन्न देऊन बघा, कधी तहानलेल्या पाणी, निराधाराला आधार देऊन बघा, त्यांचा हसणारा चेहरा जेव्हा तुम्ही बघणार ना त्यावेळचा तो आनंद, ते सुख गगनात मावेनासे असणार आहे. त्यांच्या चेहर्यावरचं ते हसू आणि आपल्याला मिळालेलं समाधान हेच आयुष्य सार्थकी झाल्याची पावती असते.”
या भूतलावर सर्वाधिक बुद्धीमान प्राणी माणूस आहे. जगाची लोकसंख्या जवळपास ७.७ अब्ज आहे. या ७.७ अब्जमध्ये आपणही माणूस म्हणूनच जन्माला आलो आहोत हेच आपले भाग्य समजा ना. आता एवढं भाग्य लाभलंच आहे, तर मग या भाग्याला भाग्यवान बनवणे आपले काम आहे ना. एकदाच मिळालेल्या या मोलाच्या आयुष्याला अधिक मौल्यवान बनवणे आपले कर्तव्य आहे. आपले आयुष्य आपल्या चांगल्या कर्मांनीच सार्थकी होऊ शकते, हे सर्वांनीच आपल्या ध्यानात ठेवायला हवं. या जगात फक्त स्वत:चाच विचार करणाऱ्यांची काही कमीच नाही. या समाजात स्वत:पुरता विचार करणारे भरपूर बघायला मिळतील. पण जो स्वत:सोबत दुसऱ्यांचा विचार करत असेल, दुसऱ्यांच्या हक्कासाठी लढत असेल तो खऱ्या अर्थाने आयुष्य जगतोय.
आयुष्यात काम करून पैसा तर सगळेच कमावतात. पण तो पैसा संपूर्ण आयुष्य आपल्या सोबत राहत नाही. पैसा जसा येतो तसाच जातोही. अगदी तसंच माणसाचं आयुष्य आहे. जसा जन्म होतो तसंच मृत्यूही होतो. जन्म होतो तेव्हा आपले आईबाबा आपलं एक सुंदरसं नाव ठेवतात. तेच नाव आपल्या मृत्युनंतरही समाजातल्या प्रत्येक माणसाच्या मनामनात रूजलं पाहिजे. प्रत्येकाच्या ह्रदयात आपलं नाव घेताच आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. आपल्या कार्याचा ठसा लोकांच्या मनात जेव्हा उमटेल तेव्हा खऱ्या अर्थाने आयुष्याचं सार्थक होणार।