डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र
पालघर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांच्या निर्देशानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ग्रामीण भागामध्ये कायदेविषयक जनजागृती होण्याकरिता ग्रुप ग्रामपंचायत सरसओहोळ, विल्कोस, शील व प्राथमिक शाळा गोऱ्हे येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक तरतुदींची माहिती होण्यासाठी व शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण काम करत असते. या कामाचा भाग म्हणून लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती होण्याकरिता ग्रामीण भागात कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रामुख्याने ज्येष्ठ विधीज्ञ सी. पी. पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा, दिलीप पष्टे यांनी कुळ कायदा, धनंजय पष्टे व खिल्लारे यांनी जामीन तरतुदी व न्यायालयीन बंदीचे अधिकार अशा विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच एम.डी. सैदानी, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, वाडा यांनी मोफत कायदेविषयक सहाय्य व विधी सेवा प्राधिकरणाची भूमिका याविषयी मार्गदर्शन करून दखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे मध्यस्थी व लोकअदालत या वैकल्पिक वादनिवारण माध्यमांमार्फत मिटवण्याबाबत ग्रामस्थांना आवाहन केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी वाडा तालुका वकील संघाचे पदाधिकारी, वाडा पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पवार व इतर अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक डी. आर. जोशी, वरिष्ठ लिपिक, तालुका विधी सेवा समिती वाडा, कनिष्ठ लिपिक, शिपाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते.