बांधकाम निष्कासित करून गुन्हा दाखल करण्याची राकेश पाटील यांची मागणी.
संदीप शेंडगे/महाराष्ट्र
मोहने : मोहने येथील कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आरक्षित भूखंडावर तीन मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे।
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहने विभागात अनेक अनधिकृत आरसीसी इमारती तयार होत आहेत या अनधिकृत इमारतीवर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यवसायिकांनी चक्क आपला मोर्चा आरक्षित भूखंडाकडे वळविला आहे. पालिकेच्या आरक्षित भूखंडावर राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. यादव नगर येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व्हे. क्र. ४६ या दवाखान्याचे आरक्षण असलेल्या आरक्षित भूखंडावर अनधिकृत तीन मजली इमारतीचे बांधकाम करून भूखंड हडप करण्याच्या तयारी सुरू केली आहे. नीलम पांडे, प्रमोद पांडे, पांडुरंग तरे, विजय पाटील यांनी दवाखान्यासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता तीन मजली आरसीसी पद्धतीच्या इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम केले आहे. याबाबत राकेश पाटील यांनी पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी त्याचप्रमाणे पालिकेचे अतिरिक्त उपायुक्त आणि अ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत ज्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे।
या इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असले तरी या अनधिकृत इमारती वर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थातूरमातूर कारवाई करून केवळ विटांचे थोडे बांधकाम तोडले आहे. ठोस कारवाई केली नसून भूखंडावर आजही पालिकेच्या आरक्षित भूखंडावर तीन मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम सुरू असा आरोप राकेश पाटील यांनी केला आहे. संबंधित अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राकेश पाटील यांनी केली आहे।
वीस दिवस उलटूनही राकेश पाटील यांच्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने पालिकेच्या निष्क्रिय धोरण पुन्हा एकदा समोर आले आहे. जी पालिका आपले आरक्षित भूखंड वाचवू शकत नसेल ती महानगरपालिका अनधिकृत बांधकामांना कसा आळा घालेल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
राकेश पाटील यांनी अ प्रभाग क्षेत्र अधिकारी यांच्याकडे कारवाई संदर्भात अनेकदा पाठपुरावा केला आहे परंतु अद्यापही या इमारतीवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे राकेश पाटील यांनी केलेल्या तक्रारीवर पालिका अधिकारी काय कारवाई करतात. या बांधकामाला पाठीशी घालतात की धडक कारवाई करून अनधिकृत बांधकाम निष्कासित करून भूखंड मोकळा करून देतात याकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे।