रस्ते खचले, पूल-साकव तुटले, मोऱ्या खचल्या, दरडी कोसळून शेतीचे झाले नुकसान, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
संभाजी मोरे/महाराष्ट्र
चिपळूण : अतिवृष्टी आणि महापुराचा चिपळूण शहरासह ग्रामीण भागाला जसा फटका बसला तसा खेड तालुक्यातील पंधरागाव विभागात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून यामध्ये या विभागातील रस्ते, सार्वजनिक विहिरी, दरडी कोसळून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या नुकसानीचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून पुन्हा एकदा नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी धामणंद येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती साखरचे सरपंच व माजी सभापती संतोष उतेकर यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यातील धामणंद पंधरागाव विभागातील नद्या दुथडी भरून वाहत होत्या. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. पंधरागाव विभाग सह्याद्रीच्या खोऱ्यात वसला असून अतिवृष्टीचा या विभागाला मोठा फटका बसला आहे. या विभागातील गावांमध्ये दरडी कोसळणे, रस्ते, मोऱ्या खचणे, पूल तुटणे, सार्वजनिक विहिरींचे नुकसान होणे अशा घटना घडल्या आहेत. यामध्ये सापिर्ली सीमेचेवाडी, साखर चौकीचीवाडी, पोसरे खुर्द, साखर बामणवाडी येथे दरडी कोसळल्या आहेत. साखर काजुचा फाटा येथील नळ पाणी पुरवठा योजनेला दरडींचा फटका बसला आहे. तसेच चोरवणे हनुमंत वाडी डांगेवाडी नागेश्वर मार्ग पायरवने नदीवरील पूल तुटला असल्याने येथील वाहतूक बंद पडली आहे. चोरवणे जखमीची वाडी येथील रस्ता खचला आहे. निवे येथील विहिरीचे नुकसान झाले आहे. निवे रामवाडी येथे रस्ता खचला असून या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे ऊतेकरवाडी बना मध्ये दरड कोसळून अनेकांच्या शेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे गडकर वाडी येथे दरड कोसळून थोडक्यात जीवित हानी टळली संपूर्ण शेती नष्ट होऊन गेली आहे, सापीर्ली सिमेची वाडी दादरी नदीवरील पूल वाहून गेला चोरवणे ऊतेकरवाडी पिण्याच्या पाण्याच्या विहिरी नदीच्या पाण्यामध्ये नादुरुस्त होऊन संपूर्ण गाळ विहिरी नाही भरला आहे यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय राहिली नाही. कुरवळजावळी गावठाण येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे एकंदरीत पंधरागाव विभागात दळण- वळण व्यवस्था बंद पडली आहे. ग्रामस्थांना नदी कडेकपारीतून ये-जा करावी लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. येथील नद्यांनी आपली दिशाच बदलली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हि सर्व परिस्थिती पाहता अतिवृष्टीने या विभागात हाहाकार माजवल्याचे चित्र आहे. दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असला तरी भविष्यात या घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे, असे मत येथील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. या नुकसानीचा आमदार भास्कर जाधव यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण व अन्य लोकप्रतिनिधीनी पाहणी करत ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी १६ रोजी धामणंद येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती संतोष उतेकर यांनी दिली.
दरडी कोसळणे यासारख्या घटना बेसुमार जंगलतोड कारणीभूत असल्याचे येथील ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. यामुळे भविष्यात या विभागात जंगलतोड रोखण्यासाठी वन विभागाने ठोस पावले उचलावीत असे देखील मत ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

