28 C
Madhya Pradesh
May 3, 2026
Bundeli Khabar
Home » भारताने श्रीलंकेचा दोन धावांनी केला पराभव
महाराष्ट्र

भारताने श्रीलंकेचा दोन धावांनी केला पराभव

Bundelikhabar

*शिवम मावीने पदार्पणातच चार गडी बाद करत सामन्यावर उठवली मोहोर*

मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : २०२३ मध्ये भारतीय संघात काही बदल केले गेले. त्यापैकीच पहिला टी२० चे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवले गेले. दुसरा आणि खूप महत्वाचा म्हणजे विराट कोहलीला ह्या प्रकारातील क्रिकेट पासून बाहेर केले गेले. त्याचे चांगलेच परिणाम भारताला नजिकच्या भविष्यात बघायला मिळतील ह्यात शंका नाही. नव्या वर्षाच्या ह्या सकारात्मक उर्जेवर भारतीय संघ आज श्रीलंके विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला. मालिकेतली पहिल्या टी२० सामन्यात भारताने अटीतटीच्या लढतीत श्रीलंकेचा दोन धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

नाणेफेक जिंकून श्रीलंकेने भारतास फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्यांच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत भारताला २० षटकांत १६२/५ असे रोखले. पण प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंका संघ २० षटकांत १६०/१० इथवरच मजल मारू शकला आणि भारताने हा सामना जिंकला.

सलामीवीर इशान किशनने भारताच्या डावाची धमाकेदार सुरुवात केली याने दोन चौकार आणि एक षटकार लगावत कसुन रजिताच्या पटकांत १७ पाया झोडपल्या. महिश थीकशानाने पॉवरप्लेच्या तिसर्‍याच षटकात आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलला (७) पायचीत केले. शुभमन बाद झाल्यानंतर भारताची धावगती रोडावली. सूर्यकुमार यादव (७) धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावून बसला. संजू सॅमसन (५) धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंडया आणि इशान किशन यांनी चौथ्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी रचत डाव सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र वानिंदू हसरंगाने इशान किशन (३७) धावांवर बाद केले. कर्णधार हार्दिककडून (२९) मोठ्या अपेक्षा असतानाच मधुशंकाने त्याला बाद करत भारताला १५व्या षटकात पाच बाद ९४ अशा दारुण परिस्थिती पोहचवले. त्यातून दीपक हुडा (२३ चेंडूंत ४१) आणि अक्षर पटेल (२० चेंडूत ३१) यांनी साहव्या विकेटसाठी ३५ चेंडूंत नाबाद ६८ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताला २० षटकात १६२/५ करता आल्या.

दासून शनाकाने (२७ चेंडूंत ४५) काढत कर्णधाराला साजेशी खेळी करत दिलेली एकाकी झुंज व्यर्थ ठरली. त्याला उमरान मलिकने बाद केले. मेंडीस (२८) धावांवर हर्षल पटेलचा बळी ठरला. करूणारत्नेने नाबाद २३ धावा करत विजयाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला. भारताच्या शिवम मावीने पदार्पणातच चार विकेट्स मिळविल्या. निसंका (१), डी सिल्वा (८), हसरंगा (२१) आणि थीकशाना (१) त्याचे बळी ठरले. शिवम मावीने (२२/४), उमरान मलिकने (२७/२) तर हर्षल पटेलनेही (४१/२) गडी बाद केले. दोन फलंदाज धावबाद झाले.

*शुभमन गिल आणि शिवम मावी यांचे टी२० मध्ये पदार्पण*

टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाच्या शिवम मावीने आपल्या पहिल्याच षटकात निसंकाचा एका पावेवर त्रिफळा उडवून खळबळ माजविली. शिवम मावीने पदार्पणातच चार विकेट्स घेतल्या. या सामन्यात दोन्ही खेळाडूंना भारतीय टी२० संघाची टोपी देण्यात आली. मावी प्रथमच भारताकडून खेळला तर शुभमन गिलने यापूर्वीच कसोटी आणि वन-डे फॉरमेंटमध्ये पदार्पण केले आहे. कर्णधार हार्दिकने अर्शदीप निवडीसाठी उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या जागी शिवम मावीला संधी देण्यात आली असे सांगितले.

दीपक हुडाला (२३ चेंडूंत ४१) सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत विरुद्ध श्रीलंका टी२० मालिकेतला दुसरा सामना ५ जानेवारी रोजी एमसीए स्टेडियमवर होणार आहे.


Bundelikhabar

Related posts

प्रसाद खापर्डे यांना यंदाचा गानसरस्वती पुरस्कार जाहीर

Bundeli Khabar

विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या “मृदगंध” पुरस्कारांची घोषणा

Bundeli Khabar

देशातील ८२% विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत जाण्यास उत्सुक: ब्रेनली

Bundeli Khabar
error: Content is protected !!