33 C
Madhya Pradesh
June 9, 2026
Bundeli Khabar
खेल

बांगलादेशची भारतावर १ गडी राखून मात

Bundelikhabar

मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडकडून १-० असा पराभूत झाल्यानंतर आज भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश विरुद्ध मैदानात उतरला. पण बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भारतीय फलंदाज फक्त कागदी वाघ असल्याचं सिद्ध झालं. २०व्या षटकाच्या अखेरीस ९२/४ अशी दयनीय अवस्था भारतीय संघाची झाली होती. शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे महारथी तंबूत परतले आणि के. एल. राहुल संघाच्या मदतीला धावून आला. त्याने ७० चेंडूंत ७३ धावा काढल्या. हीच भारताकडून सर्वोच्च धावसंख्या ठरली. केवळ चार भारतील दुहेरी धावसंख्या नोंदवू शकले. के. एल. राहुल (७३), रोहित शर्मा (२७), श्रेयस अय्यर (२४) आणि वॉशिंग्टन सुंदर (१९) तर पाव्या क्रमांकावर अवांतर १४ धावा होत्या. यावरूनच भारतीय संघ काय फलंदाजी करत होता हे समजतं. दोन खेळाडूंना खातंही उघडता आलं नाही. अशा अवस्थेत भारताने ४१.२ षटकांत १८६/१० अशी धावसंख्या नोंदवली. शाकीब अल हसनने निम्मा संघ बाद करताना केवळ ३६ धावा दिल्या. तर इबादत हुसैनने ४७/४ आणि मेहिदी हसनने ४३/१ चांगली साथ दिली.
प्रत्युत्तरादाखल बांगलादेशकडून कर्णधार लिंटन दासने ६३ चेंडूंत ४१ धावा काढल्या. मेहिदी हसनने ३९ चेंडूंत नाबाद ३८ धावा काढल्या. शाकीब अल हसनने ३८ चेंडूंत २९ धावा काढल्या. मुशफिकर रहीम १८, अनामूल हक १४, महमुदुल्ला १४ आणि मुस्ताफिजुर रहमान नाबाद १० यांनी संघासाठी योगदान दिले. भारतीय संघाने त्यांना अवांतर १७ धावा बहाल केल्या. त्यामुळे ४६ व्या षटकाच्या अखेरीस बांगलादेश १८७/९ विजयी धावसंख्या नोंदवू शकला. त्यांनी १ गडी आणि २४ चेंडू राखून भारताला पराभूत केले. महंमद सिराज (३२/३), वॉशिंग्टन सुंदर (१७/२), कुलदीप सेन (३७/२), शार्दुल ठाकूर (२१/१) आणि दीपक चहर (३२/१) यांनी गडी बाद केले.
भारतीय संघाने खेळाच्या तिन्ही विभागांत ढिसाळ कामगिरी केली त्यामुळेच त्यांना हा पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंड दौर्‍यातून माघार घेतलेल्या महारथींनी त्या कालखंडात फक्त मज्जाच केली हे दिसून येत आहे. सरावाला त्यांनी रामराम ठोकला होता. पुढच्या दोन सामन्यांतही हा संघ ह्यापेक्षा चांगली कामगिरी करू शकेल का ह्याची खात्री भारतीय क्रिकेटप्रेमींना वाटत नाही. कोहलीने टी२० विश्वचषकात चार अर्धशतकं त्याच्या खात्यावर जोडली. पण त्यापूर्वी अ‍ाणि त्यानंतर तो संघाला केवळ भारच ठरला आहे. अजूनदेखील निवड समिती किती काळ डोळेझाक करणार हा मोठा प्रश्न आहे.
मेहिदी हसनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. पण शाकीब अल हसनची कामगिरी देखील तितकीच तोलामोलाची होती हे विसरून चालणार नाही.
मालिकेतला दुसरा सामना ७ आणि तिसरा सामना १० डिसेंबर रोजी होणार आहे.


Bundelikhabar

Related posts

गोलंदाजांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने साजरी केली विजयाची हॅट्ट्रिक

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – दिल्ली कॅपिटल्सचे पुन्हा वर्चस्व

Bundeli Khabar

भारताचा झिम्बांब्वेवर ५ गडी राखून विजय

Bundeli Khabar
error: Content is protected !!