मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : हॉकी विश्वचषक २०२३ स्पर्धेत रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. दोन्ही संघांनी संघर्षपूर्ण खेळ केला. सामन्यात १२ पेनल्टी कॉर्नरवर एकही गोल होऊ शकला नाही.
जागतिक क्रमवारीत इंग्लंड भारताच्या एका स्थानाने पुढे असला, तरी गेल्या काही वर्षांत दोन्ही संघांच्या कामगिरीत फारसा फरक पडलेला नाही. बरोबरीची कोंडी फोडण्यात दोन्ही संघांना अपयश आले. आता भारताचा पुढील सामना १९ जानेवारी रोजी वेल्सविरुद्ध भुवनेश्वरमध्ये होईल. गेल्या वर्षी दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध तीन सामने खेळले होते. कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोघांमधील सामना ४-४ असा बरोबरीत राहिला होता. त्यानंतर एफआयएच प्रो लीगच्या पहिल्या फेरीत दोघांमधील सामना ३-३ असा बरोबरीत राहिला होता; तर दुसरा सामना भारताने ४-३ असा जिंकला होता. भारताने इंग्लंडविरुद्ध १० सामने जिंकले आहेत, तर इंग्लंड संघाने केवळ ७ सामने जिंकले असून ४ सामने अनिर्णित राहिले आहेत. हॉकी विश्वचषकात स्पेनचा २-० ने पराभव केल्याने भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढलेला होता. इंग्लंडनेही वेल्सविरुद्ध ५-० असा एकतर्फी विजय मिळविल्याने त्यांनाही विजयाची खात्री वाटत होती. पण सामन्याची अधिकृत वेळ संपली तेव्हा ही लढत गोल शून्य बरोबरीत सुटली होती.

