मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० मालिका २-१ फरकाने जिंकली. शेवटचा सामना जिंकून इंग्लंड संघाने एकदिवसीय मालिकेसाठी भारताला जोरदार संघर्ष करावा लागेल असे चित्र निर्माण केले. पण आज झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ५० षटकांचा खेळ खेळला नाही. इंग्लंडचा संघ अजूनही टी-२० च्या सामन्यांतून बाहेर पडला नाही असे दिसते. त्यांचे सर्व गडी २५.२ षटकांत ११० धावा करून परतले. तर भारतीय संघाने केवळ १८.४ षटकांमध्ये हे आव्हान एकही गडी न गमावता पार केले. आजच्या अंतिम ११ जणांमध्ये विराट कोहली नव्हता. तो दुखापतग्रस्त असल्यामुळे. पण ते भारतीय संघाच्या पथ्यावर पडलं असं म्हणायला हरकत नाही. नाणेफेकीचा कौल जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. रोहितचा निर्णय भारतीय संघाच्या पथ्यावरच पडला.
इंग्लंडमध्ये आज जसप्रित बुमराह नावाचं वादळ आलं आलं होतं. त्यात त्यांचे ६ गडी बाद झाले. तर महंमद सामीने ३ जणांना तंबूची वाट दाखवली तर प्रसिद्ध कृष्णाने एकाला बाद केले. इंग्लंडच्या चार फलंदाजांना खातही उघडता आलं नाही. तर ३५ धावांची भागीदारी करण्यासाठी त्यांना ८ गडी गमवावे लागले होते. कर्णधार जोस बटलरने ६ चौकारांसह ३० धावा केल्या तर डेव्हिड विलेने ३ चौकारासह २१ धावा काढल्या. ब्रायडन कारसेने २ चौकारांसह १५ धावा काढल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. परिणामी इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ २५.२ षटकांमध्ये ११० धावा करून परतला.
भारतीय संघाने सावध पवित्रा घेत पहिली काही षटकं सांभाळून फलंदाजी केली. खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने ७ चौकार आणि ५ षटकार सहाय्याने ५८ चेंडूंत नाबाद ७६ धावा केल्या. तर शिखर धवनने विजयी चौकार लगावला. त्याने ४ चौकार नाबाद ३१ धावा काढल्या. भारतासाठी पुन्हा एकदा ह्या दोघांनी सलामीसाठी शतकी भागीदारी केली. ह्या दोघांनी एकत्रित ५००० हजार धावा सलामीला येऊन केल्या आहेत. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली (६६०९ धावा) नंतर ही दुसरी भारतीय जोडी ठरली आणि आता जागतिक स्तरावर ११२ डावांमध्ये १८ शतकीय भागीदारींसह ५१०८ धावा करून चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची सर्वोच्च भागीदारी २१० धावांची आहे.
जसप्रित बुमराहला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने ७.२ षटकांमध्ये केवळ १९ धावा देऊन ६ गडी बाद केले होते.
तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना १४ जुलै रोजी (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) संध्याकाळी ५:३० वाजता सुरू होणार आहे.