मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा पन्नासावा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला. दिल्ली कॅपिटल्सने २१ धावांनी सामना जिंकला. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार ऋषभ पंतने १ चौकार आणि ३ षटकार यांच्या सहाय्याने १६ चेंडूंत २६ धावा काढल्या. त्याचा त्रिफाळा श्रेयस गोपाळने उध्वस्त केला.
सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि रॉव्हमन पॉवेल नावाची दोन वादळं एकाची वेळी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर धुमाकूळ घातला होता. गोलंदाजांची लय बिघडवली होती. डेव्हिड वॉर्नरने १२ चौकार आणि ३ षटकार यांच्या सहाय्याने ५८ चेंडूंत नाबाद ९२ धावा काढल्या. तर रॉव्हमन पॉवेलने ३ चौकार आणि ६ षटकार यांच्या सहाय्याने ३५ चेंडूंत नाबाद ६७ धावा काढल्या. दोन्ही फलंदाजांनी हैदराबादच्या गोलदाजांची पिसं काढली. २०व्या षटकाच्या अखेरीस २०७/३ असा धावांचा डोंगर उभा केला. भुवनेश्वर कुमार, श्रेयस गोपाळ आणि सिन एबॉट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. हैदराबादने ६ गोलंदाज वापरले पण भुवनेश्वर कुमार वगळता सगळ्यांच्या गोलंदाजीवर भरभरून धावा काढण्यात आल्या.
प्रत्युत्तरादाखल सनरायझर्स हैदराबादकडून यष्टिरक्षक निकोलस पुरणने २ चौकार आणि ६ षटकार यांच्या सहाय्याने ३४ चेंडूंत ६२ धावा काढल्या. त्याला शार्दुल ठाकूरने बाद केले. एडन मार्करामने ४ चौकार आणि ३ षटकार यांच्या सहाय्याने २५ चेंडूंत ४२ धावा काढल्या. त्याला खलील अहमदने बाद केले. राहुल त्रिपाठीने २ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने १८ चेंडूंत २२ धावा काढल्या. त्याला मिचेल मार्शने बाद केले. शशांक सिंगला १० धावांवर शार्दुल ठाकूरने बाद केले. उर्वरित ६ फलांदाजांना दुहेरी धावसंख्य़ाही गाठता आली नाही. त्यांनी एकत्रितपणे केवळ ३९ धावा काढल्या. त्यामुळेच सनरायझर्स हैदराबाद १८६/८ पर्यंतच मजल गाठू शकले. खलील अहमदने ३०/३, शार्दुल ठाकूरने ४४/२, एनरिच नोर्टजे, मिचेल मार्श आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
डेव्हिड वॉर्नरला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याने २० षटकं खेळपट्टीवर ठाण मांडून नाबाद ९२ धावांत काढल्या होत्या. उद्याचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडिअन्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. गुजरातचा संघ ह्या आधीचा सामना हरला होता त्यामुळे कडवा प्रतिकार करण्याची शक्यता आहे तर मुंबई इंडिअन्सचा संघ ह्या आधीचा सामना जिंकला होता त्यामुळे पुन्हा विजयाची चव चाखण्यासाठी आतुरलेला आहे.