दिपेश पष्टे/महाराष्ट्र
पालघर : माध्यमे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ तर पत्रकार हा त्या समाजाचा आरसा असतो. जो प्रतिकूल परिस्थितीत केवळ सत्य प्रगट करत आपली बाजू मांडतो. निपक्षपणे कोणत्याही विषयातील सत्य समोर आणत त्यास योग्य न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असतो, आणि या कार्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
आपल्या लेखणीतून समाजाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात येतो त्यामुळे जव्हार तालुक्यात निर्भीडपणे कार्य करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना राष्ट्रीय पत्रकारिता दिनाचे औचित्य साधून युवा सामर्थ्य प्रतिष्ठान या संस्थेने प्रथमच प्रत्येक पत्रकाराच्या घरी जाऊन यथोचित शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानने केलेल्या या अनोख्या सत्करामुळे प्रत्येक पत्रकार बंधूंनी समाधान व्यक्त करून संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.या कार्यक्रमासाठी युवा सामर्थ्य प्रतिष्ठान चे संस्थापक मुकेश वातास, उपाध्यक्ष दिपक काकरा, सदस्य गुरुनाथ सातपुते, मनोज वातास, विजय दुधेडा, किरण कुवरा, अनंता गरेल, भुपेंद्र घाटाळ, महेश बिरारी व समाजसेविका प्रमिला वातास आदी उपस्थित होते.