वृत्तपत्र वाटप करणार्या युवकाची गगन भरारी!
प्रा.डॉ.नरेश बोडखे यांची कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया आर्थिक विभागाच्या संचालकपदी निवड
अकोले : किशोर पाटील
महाविद्यालयीन जिवनात घरोघरी वृत्तपत्र वाटप करणारा मुलगा अपारक जिद्द आणि शिक्षणाच्या बळावर थेट केंद्र सरकारच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या आर्थिक विभाग संचालक पदावर पोहचतो, हे स्वप्न कि एखाद्या चित्रपटाची कहानी वाटत असली तरी ही वस्तुस्थिती असून मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील कुंबेफळ (बीबी) येथील रहिवासी असलेले प्रा. नरेश बोडखे यांनी ही किमया साकारली आहे. पुण्यातील गोखले इन्स्टिट्युट मधील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांची निवड झाली.
कुंबेफळ (बिबी) या गावापासून डॉ. नरेश बोडखे यांचा प्रवास सुरू झाला. आई – वडील शेतकरी, पावसावर आधारीत बेभरवशाची शेती असल्याने घरची परिस्थिती बेताची त्यामुळे प्रगतीसाठी शिक्षण हेच एकमेव साधन ही बाब त्यांनी हेरली. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बिबी येथील वसंतराव नाईक विद्यालयात झाले. त्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षण अर्ध्यावर थांबू नये म्हणून महाविद्यालयीन जीवनात हॉटेल मध्ये काम करून आणि घरोघरी वृत्तपत्र वितरणाचे काम करुन डॉ. नरेश बोडखे यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. इंग्रजी साहित्यात जालन्यातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि पदवीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
पदवीनंतर पुणे विद्यापिठातून अर्थशास्त्र विषयात इंग्रजी माध्यमातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात ते सेट-नेट उत्तीर्ण झाले आणि वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी मुंबई मधील चेतना महाविद्यायात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर त्यांची भारतातील अर्थशास्त्राचे पाहिले व नामांकित विद्यापीठ असलेल्या पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. येथे नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जालना जिल्ह्याचे 20 वर्षांसाठीचे व्हिजन डॉक्युमेंट बनवले. केळकर समितीमध्ये आणि पंधराव्या वित्त आयोगामध्ये देखील त्यांनी उल्लेखनीय काम केले. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प निर्मिती मध्येही त्यांनी काही काळ सहभाग नोंदवला आहे. इथेच त्यांनी पीएचडी पूर्ण केली. याबरोबरच अनेक प्रकल्पांवर संशोधन करतानाच विद्यार्थी घडविण्याचं बहुमुल्य कार्य देखील सुरू ठेवले. दरम्यान त्यांची आता केंद्र सरकारच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अर्थशास्त्र विभागाच्या संचालकपदी निवड झाली आहे.
त्यामुळे मातृतीर्थ सिंदखेड राजाचे सुपुत्र आता देश पातळीवर काम करणार आहे. हॉटेलमध्ये काम करणारा, घरोघरी वृत्तपत्र वाटणारा मुलगा एवढ्या उच्च पातळीवर केवळ जिद्द आणि शिक्षणामुळेच पोहचू शकतो त्यामुळे ग्रामीण युवकांची शिक्षणाची कास धरावी, असे आवाहन ते नेहमी करतात आणि त्यासाठी युवकांना नेहमी प्रोत्साहीत देखील करत राहतात, त्यांच्या या नियुक्तीने मातृतीर्थ तालुक्याची मान उंचावली आहे.