*मालिकेत २-१ आघाडी*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वेस्ट इंडिजने भारता विरुद्ध टी-२० मालिकेत १-१ बरोबरी साधलेली असतानाच आज तिसरा सामना वेस्ट इंडिजच्या गलथान कारभारामुळे तब्बल दिड तास उशिराने सुरू झाला. लागोपाठ दुसर्या सामन्यात हा प्रकार घडला.
भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली.
वेस्ट इंडिजकडून डावाची सुरूवात करण्यासाठी ब्रँडन किंग आणि काईल मेयर्स यांनी केली. झटपट अर्धशतकी भागीदारी करत त्यांनी डावाला आकार दिला. पण हार्दिक पांड्याने ब्रँडन किंगचा २० धावांवर त्रिफाळा उध्वस्त केला. काईल मेयर्स आणि निकोलस पुरनचा जम बसतोय असं वाटत असतानाच भुवनेश्वर कुमारने पुरनला २२ धावांवर बाद केले. पुढच्याच षटकात भुवनेश्वरने काईल मेयर्सला बाद केले. त्याने ८ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ५० चेंडूंत ७३ धावा काढल्या. रावमन पॉवेल आणि शॅमरॉन हेटमायर यांची जोडी जमलेली जोडी अर्शदीप सिंगने भेदली. त्याने रावमन पॉवेलला २३ धावांवर बाद केले. त्याच षटकात सुर्यकुमारने हेटमायरला २० धावांवर धावचीत केले. २०व्या षटकाच्या अखेरीस वेस्ट इंडिजच्या १६४/५ धावा झळकल्या होत्या.
कर्णधार रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांनी डावाची सुरूवात केली. पण रोहितला झालेल्या दुखापतीमुळे त्याला तंबूत परतावे लागले. त्याच्याजागी आलेल्या श्रेयस अय्यरने यादवच्या साथीने पहिल्या गड्यासाठी १०७ धावांची भागीदारी रचली. अय्यरला २४ धावांवर अकील हुसेनने बाद केले. यादव आणि ऋषभ पंत डाव सावरत असतानाच डॉमनिक ड्रेक्सने यादवला बाद केले. त्याने ८ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ४४ चेंडूंत ७६ धावा काढल्या. हार्दिक पांड्याला जेसन होल्डरने झटपट परत पाठवले. पण पंत आणि दीपक हुडाने भारताला विजयापार पोहचवले. पंतने विजयी चौकार मारत भारताला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. आणि भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
सुर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने ८ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ४४ चेंडूंत ७६ धावा काढल्या. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतला चौथा सामना ६ ऑगस्ट रोजी (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.