मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पाचव्या कसोटी सामन्यात पराभवाची नामुश्की ओढवून घेणार्या भारतीय क्रिकेट संघाने टी-२० च्या पहिल्या सामन्यात ५० धावांनी पराभव केला. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने मोलाची कामगिरी बजावली. नाणेफेकीचा कौल जिंकून भारताने फलंदाजी स्वीकारली.
कर्णधार रोहित शर्माने झटपट ५ चौकार मारत २४ धावा केल्या. त्याला मोईन अलीने जोस बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. दुखापतग्रस्त ईशान किशनला मोईन अलीने बाद केले. दीपक हुडा आणि सूर्यकुमार यादव चांगले खेळत असताना ख्रिस जॉर्डनने त्यांना बाद केले. दीपक हुडाने ३ चौकार आणि २ षटकांच्या सहाय्याने १७ चेंडूंत ३३ धावा काढल्या. तर सूर्यकुमार यादवने ४ चौकार आणि २ षटकांच्या सहाय्याने १९ चेंडूंत ३९ धावा काढल्या. हार्दिक पांड्याने सामन्याची सूत्र हातात घेत चौफेर फटकेबाजी केली. त्याने ६ चौकार आणि १ षटकांच्या सहाय्याने ३३ चेंडूंत ५१ धावा काढल्या. त्याला रिस टोपलेने बाद केले. हे त्याचं पहिलं अर्धशतक ठरलं. अक्षर पटेलला मॅट पार्किनसनने १७ धावांवर बाद केले. तर दिनेश कार्तिक चुकीच्या फटक्यामुळे ११ धावांवर बाद झाला. त्याला टायमल मिल्सने बाद केले. भारताची २०० पार जाईल असं वाटत असताना लागोपाठ गडी बाद झाले आणि २०व्या षटकाच्या अखेरीस १९८/८ अशी मजल भारताने मारली.
इंग्लंडची सुरूवात डळमळीत झाली. भुवनेश्वर कुमारने कर्णधार जोस बटलरला पहिल्याच षटकात शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला. हार्दिक पांड्याने त्याच्या पहिल्याच षटकात डेव्हिड मलान आणि लियाम लिव्हिंगस्टोनला बाद केले. तर पुढच्याच षटकात जेसन रॉयला देखील तंबूचा रस्ता दाखवला. हॅरी ब्रुक आणि मोईन अलीने डावाला आकार देण्यास सुरूवात केली. त्यांचा चांगला जम बसतोय असं वाटत असतानाच यझुवेंद्र चहलने दोघांनीही एकाच षटकात बाद केले. ख्रिस जॉर्डनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याला साथ मिळाली नाही. त्याने नाबाद २६ धावा काढल्या आणि इंग्लंडचा डाव १९.३ षटकांत १४८ धावांवर संपला.
हार्दिक पांड्याने ३३ धावांमध्ये ४ गडी बाद केले आणि फलंदाजी करताना ५१ धावा काढल्या त्यामुळे तोच सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. मालिकेचा दुसरा सामना उद्या (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.