वसई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्यासाहेब यांनी मराठी भाषेसाठी, साहित्यासाठी दिलेलं योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांची लेखणी जणू तलवारीचं पातंच होती. रक्ताच्या प्रत्येक थेंबात देशभक्ती आणि प्रत्येक श्वासात देशप्रेम ठासून भरलेलं होतं. त्यांनी लिहिलेली साहित्यसंपदा नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ज्यांना दृष्टी दोष अाहे त्यांच्यापर्यंतही ही साहित्यसंपदा पोहचवता आली पाहिजे ह्याच प्रामाणिक भावनेने आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली आणि ब्रेललिपीत रुपांतरीत केलेली साहित्यसंपदा इतर शैक्षणिक पुस्तकांसह वसई येथील गोवर्धन शाळेचे मुख्याध्यापक सखाराम भूमकर यांच्या उपस्थितीत जया नेंभानी आणि चिराग नागपाल यांनी भेट केली. ही पुस्तके स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादरच्या वतीने सप्रेम भेट करण्यात आली होती.

