किशोर पाटील/महाराष्ट्र
वासिंद : 15 ऑगस्ट रोजी गोठेघर ग्रामपंचायत विद्यमान सरपंच – उपसरपंच सदस्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर तत्कालीन सरपंच, दोन ग्रामविकास अधिकारी सह इतर तीन असे एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद केल्यानंतर मागे घेण्यात आले।
गोठेघर ग्रामपंचायतीच्या मागील सत्ताधारी कमिटीने केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी सबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी यासाठी या ग्रामपंचायतीच्या सध्या कार्यरत असलेल्या विद्यमान सरपंच रुचिता पिंगळे, उपसरपंच अतिश अधिकारी, सदस्य संजना डोंगरे, रंजना भोईर, ताराबाई दिवे, लक्ष्मण मुकणे यांनी या स्वातंत्र्य दिनी पंचायत समिती येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. यासंदर्भात ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते।
शहापूर तालुक्यातील शहापूर शहरा लगत असलेल्या गोठेघर ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच गणेश कामडी यांनी ग्रामविकास अधिकारी यांना हाताशी धरून बोगस कागदपत्रे तयार करून ग्रामपंचायत मधील मानव विकास कार्यक्रम अंतर्गत मत्स्यबीज खाद्य घोटाळा उघड करण्यात आला होता. तसेच यापूर्वी संरक्षक भिंत बांधणे आदी कामांबाबत अनियमितता झाल्याचे दिसून आले होते. याबाबत ठोस कारवाई होत नसल्यामुळे याबाबत विद्यमान सरपंच, उपसरपंच आदी सदस्य यांनी उपोषण सुरू केले होते।
याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रमेश महाळे यांनी शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून तत्कालीन सरपंच गणेश कामडी, ग्रामविकास अधिकारी पी.एस.कापसे, एस.एस. निपूर्ते या दोन ग्रामविकास अधिकारीसह इतर तीन असे एकूण सहा जणांविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले. तर सदर, याबाबत गुन्हा नोंद झाल्यामुळे शहापूर तहसीलदार निलिमा सुर्यवंशी, आमदार दौलत दरोडा, पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे, शिवसेना जेष्ठ कार्यकर्ते काशिनाथ तिवरे, अरुण पानसरे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आल्याचे उपसरपंच अतिष अधिकारी यांनी सांगितले।