डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र
वाडा : हिंदू संस्कृतीमधील सर्वच सण – उत्सव हे कृषी संबंधीत असून कृषी संस्कृतीचे अलौकिक दर्शन आपल्या उत्सवामधून घडत असते. असाच हा गौरी गणपती उत्सव कोकणामध्ये मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो.
गणपती आगमना पाठोपाठ कोकणात गौरीचे आगमन होते. घराघरात साजरा होणारा हा सण ख-या अर्थाने निसर्ग पूजनाचा सण असल्याचे जाणवते. आजही ग्रामीण भागात हिरव्या गौराईचे पूजन केले जाते. श्रावण सरी सुरू होताचं जंगलात ‘इंदई उर्फ गौरीची वेल’ नावाची वेलवर्गीय वनस्पती बहरायला सुरूवात होते. इतर वेळी न दिसणा-या या वेलीला आकर्षक फूल येते. हिरव्या गौरीमध्ये रानातील कोलांदी, गायगवारी, इंदयी फूल, दिंडीपर्ण आदी वनस्पती समाविष्ट असतात. निसर्गाचे पूजन या उत्सवामधून होत असते।
आपले सण आपल्याला निसर्गाकडे घेऊन जाणारे आहेत. आमची संस्कृती निसर्ग पूजक असून कृतज्ञतापूर्वक प्रत्येक सण उत्सवात जाणीवपूर्वक निसर्गाचे पूजन केले जाते. परंपरा, भाषा, पोशाख यामधून संस्कृती दर्शन होत असते. येथील प्रत्येक सणाला गर्भीत अर्थ असून तो अर्थ नव्या पीढीला समजायला हवा ज्यायोगे आमची कृती समजपूर्ण होईल. यासाठी साहित्यिकांनी आपली साहित्य निर्मिती करताना ग्रामीण संस्कृतीवर अधिकाधिक सत्य दर्शक लेखन करावे स्वप्नील पाटील(अध्यक्ष -अभिजात मराठी साहित्य सेवा संघ महाराष्ट्र)