38.9 C
Madhya Pradesh
April 17, 2026
Bundeli Khabar
Home » कविवर्य नारायण सुर्वे स्मृत्यर्थ काव्यवाचनाने रंगला शताब्दी सोहळा
महाराष्ट्र

कविवर्य नारायण सुर्वे स्मृत्यर्थ काव्यवाचनाने रंगला शताब्दी सोहळा

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : परळ येथील दि सोशल सर्व्हिस लीग या संस्थेच्या दामोदर नाट्यगृहाच्या शताब्दी वर्षानिमित्त ६ ते १० ऑक्टोबर या कालावधीत शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सव कालावधीत विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे.

दि सोशल सर्व्हिस लीग ही मुंबईतील १११ वर्ष जुनी सेवाभावी कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या दामोदर नाट्यगृहाचे हे शताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने शनिवारी कविवर्य नारायण सुर्वे स्मृत्यर्थ काव्यवाचन झाले. यामध्ये कविसंमेलन अध्यक्ष रामदास फुटाणे, सूत्रसंचालक अरुण म्हात्रे, संभाजी भगत, नीरजा, भाई मयेकर यांनी मास्तरांच्या सुप्रसिद्ध रचनांचं सादरीकरण केलं आणि सभागृहातल्या रसिकांना त्या कवितांचा आस्वाद घेता आला. कविसंमेलनाची सुरूवात शाहिर संभाजी भगत यांनी त्यांच्या पहाडी आवाजात केली. त्यानंतर ज्येष्ठ कवयित्री नीरजा, भाई मयेकर यांनी देखील मास्तरांच्या कवितांनी माहोल तयार केला. अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी सद्यः राजकीय परिस्थितीवर आधारित फटकारे मारत मैफलीत जान भरली. त्यांच्या नंतर सूत्रसंचालक अरुण म्हात्रे यांनी मास्तरांची कविता सादर करून त्यांना आदरांजली वाहिली.
कविसंमेलनाच्या सुरूवातीलाच ‘जगण्याचे आर्त’ ह्या विजय अर्जुन सावंत यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी अरुण म्हात्रे, संभाजी भगत, भाई मयेकर आणि नीरजा हेदेखील उपस्थित होते.
कविसंमेलनाच्या उत्तरार्धात दि सोशल सर्व्हिस लीगचे विश्वस्त हेमंत सुधाकर सामंत यांनीदेखील मास्तरांची कविता सादर करून त्यांना आदरांजली वाहिली. आजच प्रकाशित झालेल्या आपल्या तिसर्‍या काव्यसंग्रहातील कविता विजय सावंत यांनी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर रामदास फुटाणे, अरुण म्हात्रे, संभाजी भगत, नीरजा, भाई मयेकर यांनी आपापल्या कविता सादर करून वातावरण भारून टाकले.
मैफीलीचा शेवट करताना दामोदर नाट्यगृह शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष आनंद माईणकर यांनी सर्व मान्यवरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि शताब्दी सोहळ्याचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.


Bundelikhabar

Related posts

विद्या चव्हाण तसेच निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी राज्यपाल मुख्यमंत्री यांना दिले निवेदन

Bundeli Khabar

ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका – ओबीसी नेते हरिश्चंद्र भोईर

Bundeli Khabar

वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पत्रकारितेचा उपयोग करावा – विश्वासराव आरोटे

Bundeli Khabar
error: Content is protected !!